शेतकर्यांवर कारवाईचा बडगा; महसूल विभागाकडून 20 लाखांचा दंड
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातून मुंबई, नवी मुंबईकडे जाणारी लाल माती तस्करी काही प्रमाणात कमी झाली आहे. कर्जतचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी लाल मातीची वाहतूक करणारे ट्रक पकडले आणि त्यानंतर त्या ट्रकवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आता लाल माती ज्या शेतकर्यांच्या जमिनीमधून काढली जात आहे, त्या शेतकर्यांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात झाली आहे. नांदगाव, ओलमन आणि खांडस या तीन ग्रामपंचायतीमधील पाच शेतकर्यांना महसूल विभागाने नोटिसा पाठवल्या असून, त्या शेतकर्यांनी महसूल विभागाकडे स्वामित्व शुल्क न भरता मातीचे उत्खनन केले आहे, हे सिद्ध झाले आहे.
कर्जत तालुक्याचे वैभव असलेली लाल माती गेली दीड वर्षे बेकायदा स्वरूपात कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क न भरता त्या मातीचे उत्खनन करून वाहतूक केली जात होती. लाल मातीची तस्करी रोखण्यामध्ये कर्जतचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना मोठे यश मिळाले असून, 7 एप्रिल 2025 रोजी रात्रीच्या सुमारास तहसीलदार धनंजय जाधव यांनी कारवाई करत लाल मातीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले. त्यापैकी लाल मातीने भरलेल्या तीन गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रत्येक गाडीला दोन लाख तेवीस हजारांचा दंड आकारून तहसीलदार जाधव यांनी लाल मातीची चोरटी वाहतूक करणार्या गाड्या मालकांना मोठा हादरा दिला आहे. गाड्या मालकांवर झालेल्या कारवाईनंतर तहसीलदार जाधव यांनी आणखी मोठी कारवाई केली आहे.
मात्र, गेली एक दीड वर्षे लाल मातीचे उत्खनन शासनाला कोणत्याही प्रकारचा रॉयल्टी न भरता सुरू होती. मात्र, तरीदेखील रात्रीच्या अंधारात दररोज 40-50 ट्रक कर्जत तालुक्यातून नवी मुंबईत जात असताना शासकीय यंत्रणा मूग गिळून बसल्या होत्या, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यात ज्या जमिनीतून लाल माती काढून वाहतूक केली जात होती त्या लाल मातीचे उत्खनन करण्यासाठी शासनाचा एक रुपयाचा कर हे माती तस्कर भरत नव्हते. नांदगाव, ओलमन, खांडस आणि पाथरज या ग्रामपंचायत मधील शेतकर्यांच्या जमिनी मधील लाल माती उत्खनन करणे आणि रात्रीच्या वेळी वाहतूक करणे हे सर्व बेकायदा सुरू होते. शेतकर्यांच्या जागेतून ती माती विनापरवाना आणि कोणतेही स्वामीत्व शुल्क न देता उत्खनन करून दिली जाते, अशा जागामालकांवरदेखील कारवाईचा बडगा उगारला आहे.
कर्जत तालुक्यातील नांदगाव बलिवरे मोहपाडा या भागात विनापरवाना आणि कोणतेही रॉयल्टी न भरता लाल मातीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. ही उत्खनन केलेली लालमाती रात्रीच्या सुमारास लालमाती माफियांकडून चोरटी वाहतूक करून लंपास केली जात होती. याची खात्रीलायक माहिती मिळाल्या नंतर कर्जतचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी आपल्या सर्व मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना लाल मातीचे उत्खनन झालेल्या ठिकाणी पाठवून दिले. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या अहवाल नंतर लालमाती चोरणार्या माफियांना मोठा धक्का बसेल असा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महसूल विभागाने केलेल्या कारवाईत सध्या तालुक्यातील 3 जागा मालकांना लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत.
यामध्ये मौजे चई येथील सर्वे नंबर 25/3/ब या जागा मालकाला त्यांच्या जागेतील 254 ब्रास इतक्या माती या गौण खनिज विनापरवाना उत्खनन करण्यात आले असल्या कारणाने पाच पट दंड आकारून 11 लाख 76 हजार 718 रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे. मौजे चाफेवाडी येथील सर्वे नंबर 45/2 या जागा मालकाला त्यांच्या जागेतील 78.72 ब्रास इतक्या माती या गौण खनिज विनापरवाना उत्खनन करण्यात आले असल्या कारणाने पाच पट दंड आकारून 3 लाख 64 हजार 690 रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे. मौजे बलीवरे येथील सर्वे नंबर 127/4 या जागा मालकाला त्यांच्या जागेतील 127 ब्रास इतक्या माती या गौण खनिज विनापरवाना उत्खनन करण्यात आले असल्या कारणाने पाच पट दंड आकारून 6 लाख 64 हजार 559 रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे.
ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रत्यक्ष पंचनामे करून पाठविलेल्या अहवालानुसार संबंधित जागा मालकांना दंडात्मक कारवाईच्या नोटीसा तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी काढल्या आहेत. तसेच याबाबत काही हरकत असल्यास प्रत्यक्ष कार्यालयात येऊन खुलासा करण्याचे आदेश नोटीसमध्ये देण्यात आले आहे.दरम्यान, तालुक्यातून होणार्या लालमातीच्या विनापरवाना उत्खनन आणि वाहतुकीस तहसीलदार जाधव यांच्या कारवाई नंतर सध्या तरी आला बसला आहे. मात्र, आगामी काळात ही तस्करी पुन्हा सुरू होऊ नये याची खबरदारी म्हणून महसूल विभागाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.