। पाली/बेणस । प्रतिनिधी ।
नागोठणे येथील रिलायन्स आयपीसीएलच्या स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांनी न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दिवसभर प्रकल्पग्रस्त ठिय्या मांडून बसले होते. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या दालनात सायंकाळी उशिरा रिलायन्स व्यवस्थापन, प्रकल्पग्रस्त व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त यांनी कल्याणकर यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.
यावेळी रायगड जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नाबाबाबत रिलायन्स व्यवस्थापनाने जलद व सकारात्मक निंर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर भूमिपुत्र संस्थेशी सलग्न असलेल्या सर्व संस्था आणि वंचित बहुजन माथाडी, ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून आंदोलन अधिक उग्र करू असे स्थानिक प्रकल्पग्रस्त नेते गंगाराम मिनमीने यांनी सांगितले. यावेळी वंचीत बहुजन आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सुरेश मोहिते, मकरंद कांबळे,अख्तर अन्सारी, सिद्धार्थ दाभाडे, गंगाराम मिनमीने, पुष्पा भोईर, सुरेश कोकाटे, राकेश जवके, रोशन जांबेकर, संजय कुथे, मनोहर माळी, अल्पेश शेलार, स्मिता दाभाडे, बळीराम बडे, वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा उपाध्यक्ष ओव्हाळ, देवेंद्र कोळी, राहुल शिरसाठ, प्रेम धांदे आदींसह प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.







