जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 613 योजनांची कामे पूर्ण
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक हजार 496 पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, या योजनांपैकी 613 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर, 40 योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन, घराघरात नळ कनेक्शन दिल्याने ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला असल्याचा दावा रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.
जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान 55 लीटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची काने गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.
या योजनेच्या माध्यमातून 15 तालुक्यांमध्ये 1 हजार 496 योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने हाती घेण्यात आली आहेत. यामधील 613 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व योजनांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून, योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.
जलजीवन मिशन अंतर्गत 613 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पुढील महिनाभरात 49 योजनांची कामे पूर्ण होतील. सुरू असलेली पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ठेकेदार अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. योजनांची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत.
डॉ. भरत बास्टेवाड,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद रायगड