आदिवासीवाड्यांचे स्थलांतरण करा- वाघमारे

| कर्जत | प्रतिनिधी |

डोंगर भागातील आदिवासीवाड्यांच स्थलांतरण (पुनर्वसन) करा, अशी मागणी शासनाकडे कर्जत मधील आदिवासी सामाजिक कार्यकर्ता सोमनाथ वाघमारे यांनी केली आहे.

स्वातंत्र पूर्व काळापासून आदिवासी समाज हा डोंगर पायथ्याशी राहत आहे. दरड कोसळण्याचे अस्मानी संकट या वाड्या-वस्त्यांवर आ वासून उभे आहे. इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होऊ नये हीच अपेक्षा, असे त्यांनी म्हटले आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता इच्छा असूनही सत्ताधारी असो की विरोधक मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. कोकणात पाऊसही खूप असतो आणि या परिस्थितीत मूलभूत सोयी पोहचत नसतील तर शासनाने याचा गांभीर्य पूर्वक विचार करावा. यात सत्ताधाऱ्यांचा राजकीय लोकप्रतिनिधींचा दोष नसून निसर्ग या सुविधा टीकुच देत नाही. आमचा कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नाही. पण प्रयत्न करूनही काही साध्य होत नसेल, तर शासनाने या डोंगर भागातील वाड्यांचे स्थलांतरण (पुनर्वसन) करावे, अशी मागणी त्यांनी केली.

या वाड्या दरड सदृश्य आहेतच परंतु स्वातंत्र्यानंतर काळापासून आजपर्यंत त्यांना रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचं सखल भागात स्थलांतर (पुनर्वसन) करा, अशी मागणी केली आहे

Exit mobile version