प्रचंड पोलिस बंदोबस्तात पार पडली बैठक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील दोन महत्वाचे घटक असणार्या पक्षात पॉस्कोच्या भंगारावरुन सुरु असलेल्या वादावादीच्या पार्श्वभुमीवर पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या वादाचे पडसाद उमटण्याची वर्तविण्यात आलेली शक्यता आज खरी ठरली. या वादामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अलिबाग शहरात तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा नियोजन समितीच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्तात पार पडल्याने या बैठकीला तालीबानी दहशतवादी येणार होते की काय अशी शंका व्यक्त करत खिल्ली उडविली जात होती. शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकार्यांनी गोंधळ माजवित बैठक काही काळ बंद पाडण्याचा प्रकार केला.
आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत श्रीवर्धन, माणगावमधील शाळांच्या आवारात वाढलेले गवत, दुरुस्ती तसेच इतर सार्वजनिक कामात पक्ष बघुन निधी देणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री तसेच खासदार यांना भर बैठकीत चांगलेच सुनावले. जे शाळांसारख्या कामात राजकारण करतात त्यांच्याकडून जिल्ह्याच्या विकासाची काय अपेक्षा करणार असा प्रश्न शिवसेनेचे सदस्य तथा दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी उपस्थित केल्याने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बिघाडीत दरी आणखी रुंदावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पालकमंत्री अदिती तटकरे विकास कामांची माहिती देत असताना सदस्य अनिल नवगणे यांनी त्यांना आक्षेप घेतला. ते म्हणाले की, श्रीवर्धन मतदारसंघातच अदिती तटकरेंकडून मोठया प्रमाणावर पक्षपात केला जात आहे. शाळांच्या आवारात मोठया प्रमाणावर गवत तसेच झुडपे वाढले आहे. तसेच शाळांच्या इमारतीं नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांचे काम करताना पालकमंत्री फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असणार्या गावातील शाळांना झुकते माप देत आहेत. तर शिवसेना तसेच इतर पक्षांच्या ताब्यातील गावाकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. शिवसेनेला जिल्हा नियोजन समितीचा निधीच मिळत नसल्याचे ते म्हणाले. यावेळी उरण येथील माजी आमदार मनोहर भोईर यांनी निधी मिळत असल्याचा दावा करताच अनिल नवगणे यांनी त्यांना प्रतिउत्तर देत तुम्हाला मिळत असेल पण पालकमंत्री श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात भेदाभेद करीत असल्याचे म्हटले. अनिल नवगणे यांच्या पवित्र्यावर पालकमंत्री तसेच खासदार यांच्यासह संपूर्ण सभागृह काही काळ स्तब्ध झाला होता.
येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. या बैठकीस राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनिल तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, सर्वश्री आमदार बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, महेश बालदी, माजी आमदार सुरेश लाड, मनोहर भोईर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अॅड.आस्वाद पाटील, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, विविध शासकीय यंत्रणांचे कार्यालयप्रमुख उपस्थित होते.