पाचव्या दिवशी वीज पुरवठा पूर्ववत

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यात वादळी वार्‍याने विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न झाल्यानंतर पाचव्या दिवशी नसरापूर ग्रामपंचायत ह वीज पुरवठा पूर्ववत झाला आहे.

ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील कळंबोली वाडी येथे असलेल्या सब स्टेशनवरून जाणारी मुख्य वीज वाहिनी (दि.13) मे रोजी अवकाळी पाऊस आणि वादळी वार्‍याने खंडित झाली होती. येथील चिंचवली, गणेगाव, सालवड, चांधई, कळंबोली गावातील त्याच बरोबर नेरळ, कशेले, कडाव, विभागाला पोहचवली जाणारी पाच मुख्य वीज वाहिनीचे खांब, तसेच असंख्य झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. नेरळ, कशेळे विभागात विविध मार्गाने अडचणी सोडवून वीज पूर्ववत करण्यात आली. परंतु, काही भागात फार मोठ्या प्रमाणात अडचणी उदभवल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात वीज खांब बसविणे सहज शक्य नसल्याने तेथील वीज पुरवठा सुरळीत होण्यास अडथळा निर्माण झाले होते. 18 मुख्य वीज वाहिनी खांब आणि दोन रोहित्र पडल्याने अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करता येत नव्हता.

मात्र, सर्व प्रकारच्या अडचणी सोडवून सर्व विभागातील वीज पुरवठा रात्री साडेदहा वाजता पूर्ववत करण्यात यश आले. पनवेल कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, कर्जतचे उप कार्यकारी अभियंता प्रकाश देवके, सहाय्यक अभियंता वैभव सिंग यांनी विविध प्रकारे नियोजन करून वीज प्रत्येक विभागाला वीज खंडित होणारं नाही याची काळजी घेतली. महावितरण अधिकारी कर्मचार्‍यांना अ‍ॅड. संपत हडप, ज्ञानेश्‍वर सावंत, जनार्दन कोळंबे, सचिन हडप, राजेश मोहिते, अतुल हडप, शुभम राऊत, सुरज हडप यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Exit mobile version