| कर्जत | प्रतिनिधी |
प्रवासी कमी असल्याच्या कारणांनी पुणे-कर्जत-पुणे शटल ही गाडी रद्द केली गेली आहे असे रेल्वे प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांना कळविल्याने गरिबांची गाडी बंद केल्यामुळे आता गरिबांना सुद्धा आर्थिक भुर्दंड पडत आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोना मुळे देशभरात रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्या नंतर त्या टप्या टप्याने हळू हळू रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत परंतु कर्जत – पुणे दरम्यानची धावणारी शटल सेवा आजतागायत सुरू केली नाही. या गाडीचे भाडे इतर गाड्या पेक्षा कमी असल्या कारणाने ही गाडी फारच लोकप्रिय झाली होती. ही गाडी सुरू करण्याकरिता कर्जत रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशन चे तत्कालीन उपाध्यक्ष स्वर्गीय मांगीलाल ओसवाल यांनी पाठपुरावा केला असता काही वर्षा पूर्वी पुणे – कर्जत – पुणे ही गाडी सुरु करण्यात आली होती.
कोरोना काळात बंद केलेली पुणे – कर्जत – पुणे आजतागायत सुरू न केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. ही गाडी सुरू करावी या बाबतीत प्रवासी वर्गामध्ये खूपच मागणी आहे परंतु एव्हढे असूनही आज पर्यंत पुणे कर्जत पुणे ही गाडी सुरू करण्यात आली नाही. या बाबतीत कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करताना पुणे – कर्जत – पुणे ही शटल सेवा अद्याप का सुरू केली गेली नाही? ती त्वरित सुरू करावी ही गाडी सुरू न केल्याने गरीब प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे असे रेल्वे प्रशासनास कळविले असता रेल्वे प्रशासना कडून ओसवाल यांना पुणे – कर्जत – पुणे ही शटल सेवा रद्द केली आहे कारण सदर गाडीला प्रवासी कमी असतात असे लेखी उत्तर दिले आहे. खरं तर हे न पटण्यासारखे कारण दिले गेले आहे कारण असून ही गाडी सुरू व्हावी याला मुख्य कारण म्हणजे गाडीचे भाडे एकदम कमी व गाडीची वेळ सर्वांना सोयीची होती तसेच ही गाडी कर्जत पर्यंत असली तरी पुण्याहून मुंबई पर्यंतचे तिकीट मिळते. ही गाडी सुरू झाल्यास गरिबांची चांगली सोय होईल.
ही गाडी सुरु होईपर्यंत आपण आपला पाठपुरावा सुरूच ठेवणार आहोत. या बाबतीत आपण लवकरच खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेणार आहोत.
– पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते