प्रकल्प होणार नसतील तर जमिनी परत करा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेती व्यवसाय संबंधित प्रकल्प उभारणे, त्यातून बेरोजगारांना रोजगार देणे अशा अनेक अमिष दाखवून अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील शेकडो शेतकर्‍यांची फसवणूक करून खासगी भांडवलदारांनी जमिनी संपादीत केल्या. कवडीमोल भावाने  जमिनी घेऊन त्या ठिकाणी कोणताही प्रकल्प उभारला नाही. तर काही शेतकर्‍यांना पूर्ण जमिनीचा मोबादला देखील दिला नाही. सुपिक जमीन खार्‍या पाण्याच्या उधाणामुळे नापिक झाली आहे. त्याचा परिणाम शेतकर्‍यांवर झाला असून उपासमारीची वेळ आली आहे. संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी अखेर न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली असून सोमवार दिनांक 27 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार येणार असल्याची माहिती अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी दिली.

या दहा कंपन्यामधून मुलांना रोजगार मिळेल, शेतीसंबंधित व्यवसाय सुरु होतील असे आमिष दाखवून या जमीनी घेतल्या. परंतू अजूनपर्यंत या विकलेल्या जमीनीवर एकही प्रकल्प उभारण्यात आला नाही. गेल्या अनेक वर्षापासून ही जमीन तशीच पडीक अवस्थित पडून आहे. त्याचा परिणाम समुद्र, खाडीतील खारे पाणी जमीनीत जाऊन ही जमीन नापिक झाली आहे.

काही शेतकर्‍यांना जमिनीचा पूर्ण मोबदला न देता संपुर्ण जमीनीचा ताबा घेण्यात आला आहे. शेतकर्‍यांची पुर्णतः फसवणूक  झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी  तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. जिल्हाधिकारी यांना याबाबत चौकशी करून कारवाई करण्याच्या सुचना केल्या. मात्र जिल्हा प्रशासनापासून तालुका, गाव पातळीवरील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे शेतकर्‍यांना सहकार्य मिळाले नाही. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडेदेखील शेतकर्‍यांनी न्यायासाठी धाव घेतली. परंतू त्यांच्याकडूनही घोर निराशा झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे या संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.

समाज क्रांती आघाडी संचलीत  मेढेखार, काळवडखाडी, अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने 27 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
 प्रकल्पातून रोजगार मिळण्याचे आश्‍वासन देऊनही प्रकल्प उभारले नाही. त्यामुळे सुशीक्षीत तरुणांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. जमीनी अनेक वर्षे पिकविल्या नसल्याने त्या नापिक झाल्या आहेत. शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना भरपाई द्यावी. सध्याच्या किंमतीत जमीनी खरेदी करून फरक द्यावा. तसेच रोजगार द्यावा अशी मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे.

Exit mobile version