ग्रामीण भागावर अपूऱ्या कर्मचाऱ्यांचा परिणाम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गाव पातळीवर काम करणाऱ्या महसूल विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांची 238 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. फेरफार नोंदी मंजूर करणे. सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे. वारस नोंदी करणे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करणे. गावातून जमीन महसूल व सरकारी थकबाकी वसूली करणे, अशा अनेक ग्रामीण भागातील कामांवर रिक्तपदांचा परिणाम होत आहे.
महसूल विभागातील तलाठी आणि तहसीदार यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून मंडळ अधिकारी यांच्याकडे पाहिले जाते. कार्यक्षेत्रातील तलाठ्यांच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे. जमीन महसूल, फेरफार नोंदी मंजूर करणे. सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे. वारस नोंदी करणे. तालुक्याच्या प्रशासनात महत्वाची भुमिका बजावणे. जमीनीच्या खरेदी विक्रीनंतर तलाठ्यांनी घेतलेल्या फेरफार नोंदी तपासून मंजूर करणे, नुकसानीचा अहवाल तहसीलदार अथवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविणे इत्यादी महत्त्वाची कामे मंडळ अधिकारी यांच्याकडून पार पडतात. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये मंडळ अधिकारी यांची 90 पदे मंजूर असून 76 पदे भरण्यात आली आहे. उर्वरित 14 पदे अद्याप भरली नाहीत.
शासनाच्या महसूल विभागातील गाव पातळीवर काम करणारे महत्वाचे कर्मचारी म्हणून तलाठी हे पद आहे. सातबारा उतारा, आठ अ. फेरफार, उत्पन्न दाखल्यासाठी पंचनामा, जन्म मृत्यूची नोंद ठेवणे. जमिनीची माहिती ठेवणे. गाव नमुने अद्यायावत ठेवणे, पिकांची पाहणी करणे. शेतकऱ्यांना दाखले देणे. इतर शासकीय करांची वसूली करणे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करणे. निवडणुका, जनगणना कामात मदत करणे. आपत्कालीन परिस्थितीत गावांची माहिती घेणे ही कामे तलाठ्यांमार्फत केली जातात. सध्या ग्राम महसूल अधिकारी या नावाने तलाठ्यांना ओळखले जाते. मात्र, तलाठ्यांची 510 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 404 पदे भरण्यात आली असून 106 पदे रिक्त आहेत.
कोतवाल हे ग्रामीण महसूल प्रशासनातील शेवटचे महत्वाचे पद आहे. तलाठी आणि ग्रामस्थ, शेतकरी यांच्यामधील दुवा म्हणून कोतवाल काम करतात. महसूल गोळा करणे, दवंडी करणे, प्रशासकीय कामात मदत करणे, शासकीय योजना तलाठ्यांच्या मदतीने गावोगावी पोहचविणे, गावातून जमीन महसूल व सरकारी थकबाकी वसूलीमध्ये तलाठ्यांना मदत करण्याचे काम कोतवाल करतात. गावभेटीवर येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना मदत करणे व मानधनावर काम करणारी ही यंत्रणा आहे. जिल्ह्यामध्ये कोतवालांची 351 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 233 पदे भरली असून 118 पदे रिक्त आहे.
महसूल विभागात गाव पातळीवर काम करणाऱ्या मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांची एकूण 238 पदे शासनाकडून अद्याप भरली नाहीत. त्यामुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. एका तलाठ्याकडे दोन ते तीन सजांचा कारभार सोपविला जात आहे. त्यामुळे असंख्य गावे वाड्यांमधील कामकाज पाहताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तलाठ्यांसह मंडळ अधिकारी यांना देखील गाव पातळीवरील महसूली कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. एकाच अधिकारी व कर्मचाऱ्यावर अनेक गावांतील कामकाजाची जबाबदारी असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावाधाव होत आहे. शासनाने दिलेल्या योजनांचे नियोजन करून ते घराघरात पोहचविणे कठीण होते. त्याचा भार अनेकवेळा कोतवालावर सोपविला जातो. दाखले देण्यासाठी माहिती लिहून देण्याचे काम कोतवाल करतात. महसूल विभागातील या रिक्त पदांमुळे ग्रामीण विकासावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
रिक्तपदांवर दृष्टीक्षेप
| पद | मंजूर | भरलेली | रिक्त |
| मंडळ अधिकारी | 90 | 76 | 14 |
| तलाठी | 510 | 404 | 106 |
| कोतवाल | 351 | 233 | 118 |
| एकूण | 951 | 713 | 238 |






