। चणेरा । प्रतिनिधी ।
गेल्या सात ते आठ दिवसांपासून सतत परतीचा पाऊस पडत असल्याने तयार झालेले भात पीक धोक्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे तयार भातपीक आडवे पडल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास परतीचा पाऊस हिसकावून नेतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असून येथील शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. तालुक्यात गेल्या आठवड्यापासून परतीचा वादळी वार्यासह पाऊस पडत आहे. चणेरा, मेंढा, धाटाव, खांब, विभाग, सुतारवाडी, कोलाड विभागासह अन्य विभागातील शेतकर्यांचे परतीचा पावसामुळे नुकसान झाले आहे.
आम्ही जवळपास दिड ते दोन एकर जागेमध्ये सुवर्णा, जया भातशेती केली आहे. यंदा पावसाचे प्रमाण शेतीसाठी पूरक होते. परंतु, परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेले पीक पाऊस हिसकावून घेतो कि काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वार्यामुळे तयार पीक कोलमडून पडले आहे. या जागेमधून गेल्या वर्षी तिन खंडी भात पिकले होते. परंतु, या चालु हंगामात उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
– शैलेश पाटील, शेतकरी
परतीच्या पावसामुळे उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी भात पडलेला आहे, तर काही जागी रानडुकरे भात लोळवित आहेत. पावसामुळे शेत कापून घरी आणू शकत नाही. अशाने शेतकर्यांने करायचे काय, असा प्रश्न आम्हाला सरकारला विचारायचा आहे. आमची एकच मागणी आहे की, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट नुकसान भरपाई द्यावी.
– गणेश भगत, अध्यक्ष, शेतकरी विकास प्रतिष्ठान रोहा तालुका