पिकाचे नुकसान होण्याची भिती; शेतकरी चिंतेत
| आगरदांडा । प्रतिनिधी ।
दसर्याच्या मुहूर्तावर सुरूवात झालेल्या परतीच्या पावसामुळे परिपक्व झालेली भात कापणी लांबणीवर पडली आहे. पुढील दोन दिवस पाऊस असाच सुरू राहिला तर कापणी योग्य झालेल्या भात पिकाचे मोठे नुकसान होण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत पडला आहे.
मुरूड तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती पिकवली जाते. परंतु सध्याच्या वातावरणातील बदलामुळे व दररोज पडणार्या पावसामुळे परिपक्व झालेले भातपीक नुकसानात जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्गामध्ये चिंता पसरली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात भात कापणीला सुरुवात होते. परंतु यावर्षी सध्या लांबलेल्या परतीच्या पावसामुळे भात कापणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. पंचक्रोशी भागातील तेलवडे येथील शेतकरी कृष्णा म्हात्रे आदिंसह शेतकर्यांची भात शेती परिपक्व पीक पूर्णपणे कापणीयोग्य झाले असल्याने शेतकरी भात कापणीच्या तयारीत आहे.
परंतु दररोज सुरू असलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे भाताच्या तयार झालेल्या लोंबी गळून पडण्याची भीती शेतकर्यांना आहे.अशा नैसर्गिक आपत्तीत शेतकर्यांचे नुकसान झाल्यास केलेला खर्च तरी भरून निघेल का अशा प्रतिक्रिया शेतकर्यांतून व्यक्त होत आहे. अजून थोडे दिवस पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर यापुढे शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकर्यांपुढे निर्माण झाला आहे.