| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. राज्यात ऐन थंडीच्या दिवसात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंतातुर झाला आहे. पुढील दोन दिवस तरी हा पाऊस पाठ सोडणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. शनिवारपासूनच जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आणि रविवारपर्यंत या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला. आता हा पाऊस पुढील दोन दिवस तरी पाठलाग सोडणार नसल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
रायगड जिल्ह्यासह, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग भागातही विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली होती. तसेच सोमवारी संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस बरसेल. तर, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट अनुभवायला मिळेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रचून ठेवलेल्या उडवींचे नुकसान होऊ नये, म्हणून प्लास्टीकचे कापड टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरु झाली. काही ठिकाणी सोमवारपासून भात झोडणीला देखील सुरुवात करण्यात आली आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे जाऊ नये, म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना शेतकऱ्यांनी सुरु केल्या आहेत.
भात कापणीची कामे मागील आठवड्यांत पुर्ण होऊन अनेक शेतकऱ्यांनी भाताची उडवी रचून ठेवली आहे. शेत जमीनीकडे जाणारा रस्ता मोकळा झाल्यावर झोडणीची कामे केली जातील, या आशेवर शेतकरी होते. मात्र हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडांसह मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. पाऊस असाच सुरु राहिल्यास हातातोंडाशी आलेला घास जाण्याच्या भीतीने काही शेतकऱ्यांनी सोमवारपासून भात झोडणीलादेखील सुुरुवात केली.
अवकाळी पावसाची धास्ती घेत शेतकरी झोडणीच्या कामांमध्ये मग्न असल्याचे दिसून आले आहे. पाऊस 27 नोव्हेंबरपर्यंत पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतांमध्ये उडवींवर प्लास्टीकचे कापड टाकण्यात आले आहेत.