| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरासाठी रानवली धरणामार्फत पाणी घेतले आहे. त्या धरणाचा पाणीसाठा कमी आहे. पाणीसाठा वाढवण्यासाठी धरणातील गाळ काढून खोली वाढवायला हवी. सरकार ते करणार नसेल तर अन्य ठिकाणाहून पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून श्रीवर्धनकरांना पाणीपुरवठा करण्यात यावा. शहराला अरुंद रस्त्यांच्या समस्येने ग्रासले आहे. त्यामुळे नागरिकांसह पर्यटकांची होणारी अडचण लक्षात घेऊन शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात यावे किंवा शहरातून बाहेर ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे पंडित पाटील म्हणाले.
गेल्या बारा वर्षात श्रीवर्धन तालुक्यात विकासकामे झाली. पर्यटन क्षेत्र असल्यामुळे येथे पर्यटक वाढले. परंतु शहराचे मुख्य रस्ते अरुंद आहेत. त्या रस्त्यांचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. पर्यटकांच्या गाड्या गावात आल्यावर स्थानिकांना त्रास होतो. वादविवादांमुळे पर्यटकांना ही त्रास होतो. मोठी वाहने आल्यावर त्यांना श्रीवर्धन बसस्थानकाजवळ गाड्या उभ्या करून पुढे जावे लागते. त्यामुळे सरकारने श्रीवर्धनसाठी विकासात्मक आराखड्याचे नियोजन करावे, असे पंडित पाटील म्हणाले. महेश्वर आळी ते जीवनाबंदर जेट्टी पर्यंतच्या खड्डेमय रस्त्यांबाबत पंडित पाटील यांनी लक्ष वेधून घेताना सांगितले की, या दीड किलोमीटरच्या परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. जीवनाबंदर तसेच समुद्र किनाऱ्यावर पर्यटक फिरायला जातात. खड्डेमय रस्त्यांनी व उघड्या गटारांनी स्थानिक व पर्यटक त्रस्त झाला आहे. महेश्वरआळी रस्त्याला नगरपरिषद प्रशासनाने त्यांना उपलब्ध झालेल्या निधीमधून निधी द्यावा. रस्ता, भूमिगत गटारे तयार करावीत. रायगड जिल्हात सर्वाधिक निधी हा श्रीवर्धन नगरपरिषदेला मिळतो. मूलभूत समस्यांवर खर्च करायला पाहिजे पण तिथे खर्च होत नाही, असे पंडित पाटील यांनी नमूद केले.
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक एक येथील पटांगणात शाळेच्या इमारतीला लागूनच दोन वृक्ष आहेत. सध्या चक्रीवादळे होत आहेत. इमारतीच्या बाजूला असलेले वृक्ष इमारतींवर पडून शासकीय मालमत्तेचे नुकसान होते. शाळेच्या पटांगणातील वृक्षांबाबत मुख्याधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. प्रशासनाने नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी गंभीर दखल घ्यायला हवी. श्रीवर्धन समुद्रालगत असल्याने वादळाचा धोका कायम आहे. यामुळे तातडीने हे वृक्ष बाजूला कायाला हवेत, असे पंडित पाटील म्हणाले.