रस्त्यांच्या साईडपट्ट्या अपघाताला निमंत्रण

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

काही दिवसांपूर्वीच शहरातील मारुती मंदिर ते माळनाकादरम्यान करण्यात आलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणानंतर करण्यात आलेल्या साईडपट्ट्यांवर मोठी खडी केवळ पसरवून ठेवल्याने या साईडपट्ट्या अपघातांना निमंत्रण देणार्‍या ठरत आहेत. साईडपट्ट्यांवर रोड रोलर न फिरवल्याने वाहनचालक खरेदीसाठी जाताना आपली वाहने साईडपट्टीवर उभी करण्याऐवजी अर्ध्या रस्त्यातच उभी करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते माळनाका यादरम्यानच्या एका मार्गिकेवर काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर करण्यात आलेली साईडपट्टी पादचार्‍यांसह वाहनधारकांसाठीदेखील डोकेदुखी ठरत आहे. काँक्रिटीकरणाचा रस्ता संपल्यानंतर साईडपट्टी म्हणून बनवण्यात आलेल्या भागात मोठी खडी अक्षरशः पसरवून ठेवण्यात आली आहे. यामुळे पादचार्‍यांना त्यावरून चालणेदेखील अवघड बनले आहे. छोट्या वाहनांना तर साईडपट्टीवरून काँक्रिटीकरणाच्या रस्त्यावर वाहने आणणे अवघड झाले आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक दुकानांमध्ये गर्दी करू लागले आहेत. वाहनधारकांना चारचाकी वाहने साईडपट्टीवर उभी करतानादेखील कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेक वाहनचालक हे आपली वाहने तकलादू साईडपट्टीवर नेण्याऐवजी अर्ध्या रस्त्यात उभी करीत आहेत. यामुळे मारुती मंदिर ते माळनाका या काँक्रिटीकरण पूर्ण झालेल्या लेनवर मागील काही दिवसांपासून वाहतुकीची विनाकारण कोंडी होताना दिसत आहे.

Exit mobile version