। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने धारावीत छापे टाकले असता पुनर्वापर केलेल्या तेलाची विक्री करणारे रॅकेट मुंबईत सक्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. हातगाडीधारक, स्टॉलधारक, छोट्या रेस्टॉरंटकडून असे खाद्यतेल विकले जात असल्याचा संशय असून आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे. नियमानुसार दिवसाला 50 लिटर तेलाचा वापर करणार्या अन्नविक्रेत्यांना तीन वेळाच खाद्यतेलाचा वापर करता येतो. हा वापर झाल्यानंतर या तेलाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी तेल साबण वा बायोडिझेल तयार करणार्या कंपन्यांना देणे बंधनकारक आहे. तर 50 लिटरपेक्षा कमी तेलाचा वापर करणार्यांनी हे तेल खाण्यात येऊ नये याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन होते का याची तपासणी करण्यासाठी एफएसएसआयकडून 2 ते 17 सप्टेंबरदरम्यान एक मोहीम राबविण्यात आली.