| प्रतिक कोळी |
जेणे हे घातली मुक्तीचे गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥
या शब्दांत जगद्गुरू तुकोबाराय ज्या वैष्णवाचे यथार्य वर्णन करतात, ते म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर. एका तरूणाने ऐन उमेदीच्या काळात ज्ञान-कर्म आणि भक्ती अशा समन्वयीत योगावर आधारलेल्या प्रदीर्घ ग्रंथाद्वारे विश्वबंधुत्वाची, निःस्वार्थ प्रेमाची शिकवण देणे आणि त्यानंतर काही काळातच विरक्त वृत्ती अंगीकारत संजीवन समाधीद्वारे या जगाचा निरोप घेणे, अशी घटना महाराष्ट्राच्या गौरवशाली आणि पूजनीय अशा इतिहासात सुमारे 700 वर्षापूर्वी नोंदविली गेली आहे. स्थितप्रज्ञ योगी, आत्मानुभवी संत, क्रांतीदर्शी तत्त्वज्ञ आणि अभिजात साहित्यिक अशा चतुर्विध भूमिकेत प्रभावीपणे आपले कर्तृत्त्व सिद्ध करणार्या ज्ञानराज माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास आजमितीस 725 वर्ष पूर्ण होत आहेत. ज्ञानेश्वरांची समन्वयकदृष्टी ही त्यांच्या जीवितकार्याशी सुसंगत आहे. जे-जे उदात्तकडे नेते, ते-ते प्रामाणिकपणे स्वीकारून स्वतःचा तसेच स्वतःबरोबरच समाजाचा नैतिक तथा अध्यात्मिक विकास साधावा, असा प्रेरक विचार त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या जीवनकार्यातून पदोपदी व्यक्त होतो. मर्हाटीच्या नगरीत त्यांनी ब्रम्हविद्येचा सुकाळ केला. साहित्यसोनियाच्या खाणी उघडून मराठी भाषेच्या वैभवाचा पाया रचला. त्यांच्या साहित्यसंपदेमध्ये भावार्थदीपिका, चांगदेवपासष्टी, अमृतानुभव, हरिपाठाचे तसेच इतर अभंग या प्रमुख साहित्यांचा समावेश होतो. यापैकी चांगदेवपासष्टी हे सर्वांत लहान प्रकरण. चांगदेवांसारख्या सिद्धयोग्याच्या डोळ्यांत ज्ञानाचे अंजन घालणारे 65 ओव्यांचे हे पत्र. एका तत्वज्ञ मित्राने दुसर्या तत्वज्ञ मित्रासोबत केलेला सुसंवाद. तर अमृतानुभव हा त्यांचा आत्मसंवाद. तर शतकानुशतके अज्ञानात खितपत पडलेल्या, समाजाच्या गैरसमजातून अव्हेरल्या गेलेल्या आणि द्वेषभावनेच्या विषवल्लीतून मानवी समाजातील आपल्याच बांधवांचा अव्हेर करणार्या अशा प्रत्येक मानवासह सामाजिक पातळीवर केलेला सुसंवाद म्हणजे भावार्थदीपिका अथवा ज्ञानेश्वरी.
700 वर्षानंतरही या ग्रंथाचे ताजेपण, या ग्रंथातला रस आजही ओझरताच आहे. भारतीय धार्मिक साहित्यातील, विशेषतः भागवत धर्मातील ग्रंथामध्ये देवभाषा म्हणून अधिमान्यता पावलेल्या संस्कृत भाषेत अडकून पडलेल्या ज्ञानाच्या आधारे मानवी समाजातील सर्वांनीच आपला आत्मोद्धार करावा ही तळमळ ज्ञानेश्वरांना लागली होती. आणि समाजोद्धाराच्या याच तळमळीतून श्रीमत्भगवतगीतेसारख्या महान ग्रंथावर अत्यंत साध्या, सोप्या, रसाळ, आकर्षक पण सुबोध भाषेत प्रदीर्घ टीकेचा प्रबंध रचला. या प्रबंधाच्या आशयात व्यतिरेकापेक्षा मूळ अन्वयावर भर देत, आपल्या कर्तव्यांच्या पूर्तीद्वारे, दया-क्षमा-शांती या त्रिपुटीने युक्त होत फक्त मानवी समाजाची नव्हे, तर सकल भूतमात्रांची सेवा करणे, हीच खरी भक्ती असल्याचे प्रतिपादन ज्ञानियांच्या राजाने केले आहे. भावार्थदीपिका अथवा ज्ञानेश्वरी म्हणजे गीतार्थाचे काव्यमय निरूपणच आहे. या ग्रंथात सर्वसामान्यांसाठी दुर्बोध आणि अत्यंत गहन पण किचकट असणारा तत्वज्ञानासारखा विषय त्यांनी उपमा, अलंकार, दृष्टांत, रूपके आदींच्या सहाय्याने अत्यंत सोपा करून मांडला आहे. आत्मविद्येच्या प्रचारासाठी थाटलेल्या वाङ्मय प्रपंचात ते भाषाप्रभुत्वाची परिसीमा गाठतात. ज्ञानेश्वरांच्या जन्मापूर्वीपासून ते त्यांच्या नामलौकिकापर्यंत समाजाने अखंड जाच करूनही त्यांचा सर्व पातळीवर उद्धार व्हावा, हीच त्यांची तळमळ राहिली आहे. भावार्थदीपिका अथवा ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा पदझंकार असणार्या पसायदानात त्यांच्या आंतरिक माधुर्याचा, चराचर विश्वकल्याणाच्या भावनेचा प्रत्यय अधिक येतो. त्यांच्या साहित्यरचनेतील प्रत्येक शब्दांमधून वैश्विक ऐक्यभावाची ग्वाही देणार्या, प्रसन्न, मधुर तसेच शांतरसाने ओतप्रोत भरलेल्या काव्यात जन्मापासून द्वेषभावनेचा, तिरस्काराचा साधा लवलेशही आढळत नाही. उलट ते दुरीतांचे तिमीर म्हणजे त्यांची अज्ञानी वृत्ती नष्ट होण्याची प्रार्थना सर्वप्रथम करतात. ज्ञानेश्वरांनी खर्या अर्थाने तत्वज्ञानाच्या गर्भात दडलेल्या विश्वबंधुत्वाची, निरपेक्ष, उपाधीरहित अशा प्रेमाची प्रचिती आपल्या कृतीतून आणि साहित्यातून दिली आहे. म्हणूनच या ज्ञानियांच्या राजाला वारकरी संप्रदायातच नव्हे तर वैश्विक पातळीवर माऊली म्हणूनच संबोधले जाते. या महान योगीराजाच्या चरणी आमचे सादर दंडवत.