सर्पमित्रांनी दिले अजगराला जीवनदान

। उरण । वार्ताहर ।
चिरनेर गावातील रहिवासी निलेश केणी यांच्या शेतघरामधील कोंबडी खाण्यासाठी शिरलेल्या अजगर सापाला सर्पमित्र विवेक केणी यांनी पकडून वनविभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जंगलात सोडून दिले.
पावसाळा सुरू झाल्याने सरपटणारे प्राणी आपल्या सुरक्षेसाठी तसेच भक्ष्य पकडण्यासाठी सैरभैर झाले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणार्‍या शेतकर्‍यांना सरपटणारे प्राणी दंश करण्याच्या घटनाही घडत आहेत. चिरनेर गावातील रहिवासी निलेश केणी यांच्या शेतघरातील पाळीव कोंबड्यांच्या खुराड्यात मोठा सरपटणारा साप जातीचा प्राणी शनिवारी ( दि25) शिरल्याचे दुक्ष्य केणी कुटुंबाच्या निर्दशनास आले. त्यानी ताबडतोब वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्पमित्र संस्था चिरनेरचे अध्यक्ष विवेक केणी यांना फोन करून माहिती दिली.विवेक केणी यांनी सदर घटनेची माहिती त्यांचे सहकारी सर्पमित्र मनोहर फुंडेकर आणि काशिनाथ खारपाटील यांना दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून सर्पमित्र मनोहर फुंडेकर व काशिनाथ खारपाटील यांनी तातडीने शेतघराकडे धाव घेऊन तो साप पकडला. पकडलेल्या सापाची माहिती वनविभागाच्या अधिकारी वर्गाला देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी सी.डी. पाटील, संतोष ईगोल, राजेंद्र पवार, सय्यद तसेच सर्पमित्र, विवेक केणी, काशिनाथ खारपाटील, मनोहर फुंडेकर यांच्या उपस्थित बेळडोंगरात अजगराला सोडण्यात आले.

Exit mobile version