Save Water! नवी मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
पावसाने ओढ दिल्याने या वर्षी नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण भरेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. धरण भरण्यासाठी धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी 4500 मिमी पावसाची गरज भासणार आहे. सध्या धरणात 15 ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षी पाऊस झाल्याने धरण पातळीत वाढ होत आजच्या दिवशी 75 मीटर पाणी पातळी होती. ती आता 5 मीटर कमी असून आता 70 मीटर पाणीपातळी आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास नवी मुंबई शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होता. हे धरण काही वर्षांचा अपवाद वगळता कायम पूर्ण क्षमतेने पूर्ण भरून वाहते. त्यामुळे शहराला कधीही पाणीटंचाई भासत नाही. 24 तास पाणीपुरवठा करणारे शहर म्हणून नवी मुंबईचा राज्यात नावलौेकिक आहे.

या वर्षी नवी मुंबईत 10 जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला आहे. मात्र शहरात व धरण पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस झाला आहे. आतापर्यंत फक्त 188 मिमी पावसाची नोंद धरण पाणलोट क्षेत्रात झाली आहे. मागील वर्षी आतापर्यंत 899.20 मिमी तर सरासरी 3800 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत होते. यावर्षी आतापर्यंत तुरळक पाऊस झाल्याने पुढील काळात धरण भरण्यासाठी सरासरी 4500 मिमी पावसाची आवश्यकता आहे. आतापर्यंत धरण 50 टक्केपर्यंतही भरलेले नसल्याने पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून चिंता व्यक्त होत आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास शहरावर पाणीकपात करण्याची वेळ येणार आहे. 2018 या वर्षी धरण 25 जुलै रोजी तर 2019 या वर्षी 4 ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरले होते.

शहराला पाणी पुरवठयासाठी या धरणातून प्रतिदिन 420 दशलक्ष लिटर पाणी दररोज घेतले जात आहे. त्यातून नवी मुंबईसह कामोठे व मोरबे परिसरातील 7 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. हे धरण 88 मीटर पातळीला पूर्ण भरते आणि तेव्हा धरणात 190.89 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो. सद्यास्थीतीत 27.82 टक्के पाणीसाठा असून 70.02 मीटर पाण्याची पातळी असून 53.110 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. हा उपलब्ध पाणीसाठा 15 ऑगस्टपर्यंत पुरेल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

Exit mobile version