| पालघर | प्रतिनिधी |
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा खरेदी केल्या आहेत. विशेषतः पाण्यात बुडालेल्या व्यक्तींचा जलद शोध घेण्यासाठी या यंत्रणांचा मोठा उपयोग होणार आहे. अग्निशमन विभागाने 7 ‘सोनार स्कॅनर सर्च कॅमेरा’ यंत्रणा खरेदी केल्या असून, यामुळे तलाव, विहिरी, नदी, बावखळ आणि इतर जलस्रोतांमध्ये शोध मोहिमा अधिक परिणामकारक आणि सुरक्षित बनणार आहेत. या सोनार स्कॅनर यंत्रणेद्वारे पाण्याखालच्या भागाचा थेट स्क्रीनवर देखावा मिळतो. त्यामुळे पाण्यात उतरण्याआधीच संभाव्य ठिकाण निश्चित करता येते.
या यंत्रणेमुळे बचावकार्याचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. तसेच, जवानांचा जीव धोक्यात न घालता शोधकार्य करता येणार आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत दरवर्षी जलप्रदूषण आणि तसेच बुडण्याच्या घटना घडत असतात. अशा घटनांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी ही आधुनिक साधने महत्त्वाची ठरणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या पावसाळी हंगामात नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी ही आधुनिक साधने एक प्रभावी साधन ठरणार आहेत, असा विश्वास अग्निशन विभागाचे मुख्य अधिकारी दिलीप पालव यांनी व्यक्त केला जात आहे.