। रायगड । खास प्रतिनिधी ।
सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यीनींना तेथील वॉर्डन वेळेवर जेवण देत नसल्याने मुलींवर उमासमारीची वेळ आली आहे. तसेच, सदरची वॉर्डन रात्री वसती गृहात राहत नसल्याने विद्यार्थ्यीनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसतीगृहाबाबतच्या तक्रारी सातत्याने वाढत असल्याने सहायक आयुक्तांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये तातडीने सुधारणा करावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शेकापच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दिला. त्यानंतर सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी याची दखल घेत यामध्ये तातडीने सुधारणा करण्यात येत असल्याचे सांगितले.
गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुलींना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत आहे. शिक्षण घेत असताना त्यांना राहण्याची, खाण्याची अबाळ होऊ नये यासाठी मुलींसाठी राज्याच्या विविध भागांमध्ये वसतीगृह उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी मुली राहून आपले शिक्षण पूर्ण करतात. अलिबाग येथील असणाऱ्या वसतीगृहामध्ये राहणाऱ्या मुलींची व्यथा मात्र निराळीच आहे. या ठिकाणी सोयी सुविधांची वाणवा असल्याने वसतीगृहात राहायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. या ठिकाणी मुलींची काळजी घेण्यासाठी वॉर्डनची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र सदरच्या वॉर्डनबद्दलच मुलींच्या बऱ्याच तक्रारी आहेत. येथील इमारतीला गळती लागली आहे. मुलींना वेळेवर जेवण दिले जात नाही. त्यामुळे मुलींवर उपाशी राहण्याची वेळ येत आहे. रात्री वसतीगृहात वॉर्डने राहणे गरजेचे असताना सदरची वॉर्डन मात्र मुलींना एकटे सोडून खुशाल आपल्या घरी जाते. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहातील एका मुलीवर अत्याचार करुन तीला ठार मारण्यात आले होते. यामध्ये तेथील सुरक्षा रक्षकाचाच हात असल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. अशा घटना ताज्या असल्याने अलिबाग येथील मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदरची बाब शेकापच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांना समजताच त्यांनी सहायक आयुक्तांना याबाबत जाब विचारला.
मुलींच्या बाबतीमध्ये काही बरे वाईट घडल्यास जबाबदार कोण? यामध्ये तातडीने सुधारणा करा अन्यथा या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.
चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख, शेतकरी कामगार पक्ष
त्यानंतर सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी तातडीने पावले उचलली. मुलींना वेळेवर जेवण देण्याच्या, तसेच वॉर्डन रात्री मुलींसोबत राहावे असे निर्देश वॉर्डनला दिले असल्याचे जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, मुलींना वेळेवर जेवण दिले जाते. मी ज्या रुममध्ये राहते. त्याची दुरुस्तीचे काम सुरु असल्याने तेथे राहणे शक्य नव्हते. जाधव सरांनी याबाबत सुचना दिल्या आहेत त्याचे पालन केले जाईल, असे वॉर्डन उषा गुजेला यांनी कृषीवलला सांगितले.