। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
देश संकटात आहे. केंद्रातील सत्ताधारी इंग्रजांप्रमाणेच हुकूमशाही करीत आहे. सरकार शेतकर्यांचा, कामगारांचा, कष्टकर्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. देशात फुट पाडण्याचे काम हे सरकार करीत आहे. त्यामुळे जागे व्हा. देशावर राज्य करु पाहणार्या सरकारला वेळीच थांबवा. रायगड हा शेतकरी, कामगारांचा जिल्हा आहे. आज शेतकरी कामगार पक्षाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या पक्षाला इतिहास आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी शेकाप लढला आणि जिंकला. शेकापमध्ये निष्ठावंत असे उर्जा निर्माण करणारे कार्यकर्ते आहेत. आज देश आर्थिक संकटात आहे. आपल्या 80 रुपयाची किंमत अमेरिकेच्या 1 डॉलरइतकी आहे. म्हणजेच आपण आर्थिकदृष्ट्या अमेरिकेचे 80 टक्के गुलाम झालो आहोत. केवळ 20 टक्के स्वातंत्र्य आपल्याकडे आहे.
अर्थव्यवस्था संकटात सापडली तर सरकार स्थिर राहू शकत नाही. त्यामुळे आता चळवळ उभी करावी लागेल. आपण सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येत हा लढा उभारु. शेतकर्यांसाठी, कष्टकर्यांसाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी आता चळवळ उभारावी लागेल. बर्याच सत्ताधारी पक्षातील नेत्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही. पण देशाला जेव्हा जेव्हा संकटात सापडला, त्या-त्या वेळी महाराष्ट्राने कणखर नेतृत्व देशाला दिले. देशाच्या चळवळीत याच महाराष्ट्राने लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, राजगुरु यांसारखे अनेक लढवय्ये नेते याच महाराष्ट्राने देशाला दिले आणि क्रांती घडवून आणली.
स्वतंत्र भारतात 75 वर्षापुर्वी जेव्हा शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली, त्यावेळी जनेतेने स्वप्न पाहिले कि, देशात शेतकरी, कामगार, कष्टकर्यांचे राज्य असेल. जोपर्यंत शेतकरी, तरुण, कृषी, कामगार पुढे जाणार नाही तोपर्यंत देश पुढे जाणार नाही. स्वतंत्र भारतातनंतर बेरोजगारी घराघरात पोहोचली आहे. संपूर्ण भारतात बेरोजगारी पसरली आहे. देशाला रोजगार, औद्योगिकरण, शिक्षण हवे आहे. मात्र सरकार धर्माच्या नावावर देशात फुट पाडण्याचे काम करीत आहे. देश वाचेल तर रायगड वाचेल. म्हणूनच देश वाचविण्याच्या चळवळीत सहभागी व्हा. केंद्र सरकारच्या लाटेत आज आम आदमी पार्टी दिल्लीवर राज्य करीत आहे.
सर्वांनी मिळून लढाईत उतरलो तर क्रांती घडेल. निराश होण्याची गरज नाही. शेतकरी, कामगार, नव्या पिढीला जोडण्याची गरज आहे. शेकाप या सभेमुळे केवळ रायगड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात उर्जा निर्माण करेल. आ. जयंत पाटील यांच्यातील उमेद, जिद्दीने काम करण्याची इच्छा, त्यांच्या चिकाटीमुळेच आज शेकापच्या कार्यक्रमात येण्याचे इच्छा थांबवू शकलो नाही.शेकापच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता आपण एकत्र येऊन देशाला वाचवू शकतो, याची जाणीव झाली.
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आम आदमी पाटीचे नेते तथा दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय बोलत होते.