| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश होण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडूने उराशी बाळगले आहे. त्याचप्रमाणे मी पण खूप आशावादी आहे. संघात स्थान पक्के करण्यासाठी झगडतोय. अशी प्रतिक्रिया शार्दुल ठाकूरने व्यक्त केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एक मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 200 धावांनी मोठा विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्याच्या मालिकेवरही आपले नाव कोरले. या विजयात अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने 4 बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाजीत तो फार काही करू शकला नसला, तरी मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. या कामगिरीच्या जोरावर शार्दुल ठाकूरने भारताच्या विश्वचषक संघात आपल्या निवडीसाठी दावा मजबूत केला आहे. या सामन्यानंतर शार्दुल ठाकुरने प्रतिक्रिया दिली.
शार्दुल ठाकूरनेही आपली भूमिका संघासाठी महत्त्वाची का ठरते हे सांगितले. तथापि, सीम-बॉलिंग अष्टपैलू खेळाडूने आपले स्थान निश्चित करण्यापेक्षा संघासाठी योगदान करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवला जाणार आहे. संघ व्यवस्थापनाला स्पर्धेपूर्वी खेळाडूंना त्यांचे स्थान निश्चित करण्याची संधी द्यायची आहे.असे तो म्हणाला.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर शार्दुल ठाकूर म्हणाला, या मालिकेत आठ बळी मिळाल्याने मी खूश आहे. क्रिकेटपटू म्हणून आपण वर्षानुवर्षे या संधीची वाट पाहतो. कधी तुम्ही परफॉर्म करता, तर कधी करत नाही. मी खेळत असलेली प्रत्येक मालिका नेहमीच माझा आत्मविश्वास वाढवते. कारण मी माझ्या कारकिर्दीत फक्त अनुभव जोडत असतो. माझी जागा पक्की करण्यासाठी मला खेळावे लागेल, असा मला कधीच विचार आला नाही. कारण मी त्या मानसिकतेने खेळू शकत नाही आणि मी तसा खेळाडू नाही.असे तो म्हणाला.
शार्दुल ठाकूर म्हणाला, माझी विश्वचषकाच्या संघात निवड झाली नाही, तर तो त्याचा निर्णय असेल. मी याबद्दल फार काही करू शकत नाही. मी नेहमी संघासाठी कामगिरी करण्याचा आणि सामन्यातील परिस्थितीनुसार खेळण्याचा प्रयत्न करतो. अष्टपैलू म्हणून खालच्या क्रमाकावर फलंदाजी करणे ही माझी भूमिका महत्त्वाची आहे. मी फक्त एक एकदिवसीय मालिका खेळलो नाही. मी भारतातील श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचा भाग नव्हतो, पण त्याशिवाय मी दोन वर्षांत सर्व मालिका खेळलो आहे. संघाला माझ्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळेच माझी निवड झाली आहे. जेव्हा-जेव्हा मला संधी मिळते, तेव्हा मला वाटते की संघाचा माझ्यावर विश्वास आहे.असे तो म्हणाला.
गेल्या काही वर्षांत आम्ही खालच्या फळीपर्यंत फलंदाजी ठेवली आहे. अष्टपैलू खेळाडू असल्याने माझी भूमिका महत्त्वाची आहे. मी माझे सर्वोत्कृष्ट योगदान देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरुन मी माझे प्रयत्न दिले आहेत याची खात्री देता येईल. विश्वचषकापूर्वी प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. प्रत्येक विभागात तुम्हाला स्वतःचे मूल्यांकन करावे लागेल. संघ व्यवस्थापनाचीही नजर तुमच्यावर असेल. वैयक्तिकरित्याही प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असतो.
शार्दुल ठाकूर,गोलंदाज