| मुंबई | वृत्तसंस्था |
रणजी ट्रॉफी फायनल 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीत मुंबईचा पहिला डाव आटोपला आहे. मुंबईने शार्दूल ठाकुर याच्या 75 धावांच्या ताबडतोड खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ऑलआऊट 224 धावा केल्या. शार्दूलने केलेल्या चिवट खेळीमुळे मुंबईला 200 पार मजल मारता आली. टॉस गमावून बॅटिंगला आलेल्या मुंबईची शानदार सुरुवात झालेली. मात्र त्यानंतर विदर्भच्या भेदक माऱ्यासमोर मुंबईचा डाव गडगडला. पण शार्दुलने एकट्याने डाव सावरत मुंबईसाठी तारणहाराची भूमिका बजावली.
ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत आपला तडाखा कायम ठेवला आहे. शार्दूलने मुंबईसाठी सेमी फायनलमध्ये तामिळनाडू विरुद्ध शतक ठोकलं होतं. शार्दूलने त्यानंतर आता पुन्हा एकदा धमाका केलाय. शार्दूलने विदर्भ विरुद्ध रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम अडचणीत असताना घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये झंझावाती अर्धशतक ठोकलं आहे. शार्दूलने वानखेडे स्टेडियममध्ये चिवट आणि वादळी खेळी केली. शार्दूल रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या या अंतिम सामन्यात अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. शार्दूलला या अर्धशतकी खेळीनंतर मुंबईकर क्रिकेट चाहत्यांनी अनोखी सलामी दिली.
शार्दूलने पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात 53 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर आदित्य सरवटे याच्या बॉलिंगवर एक धावा घेत अर्धशतक पूर्ण केलं. शार्दुलने या अर्धशतकादरम्यान 2 षटकार आणि 6 चौकार ठोकले. शार्दूलच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 12 वं अर्धशतक ठरलं. शार्दुलने 135.1 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं.
विदर्भाने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पृथ्वी शॉ आणि भूपेन ललवाणी या दोघांनी 81 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर मुंबईची घरसगुंडी झाली. मुंबईची लंचपर्यंत 4 बाद 109 अशी स्थिती झाली. लंचनंतर मुंबईची अशीच स्थिती राहिली. मुंबईने 176 धावा होईपर्यंत 8 विकेट गमावल्या होत्या. पण शार्दूल ठाकुर एकटाच पुरुन उरला.
शार्दूलने आठव्या स्थानी बॅटिंगला येत धमाका केला आणि अर्धशतकी खेळी केली. शार्दूलमुळे मुंबईला 200 पार मजल मारता आली. शार्दूल 7 व्या विकेटसाठी शम्स मुलानी याच्यासोबत 43 आणि तनुष कोटीयन याच्यासह आठव्या विकेटसाठी 22 धावा जोडल्या. तर त्यानंतर तुषार देशपांडे याने शार्दूलला चांगली साथ दिली.







