| अलिबाग | प्रतिनिधी |
आपल्या न्याय्य हक्कासाठी जिल्हा सुरक्षा रक्षक अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सोमवारी (दि.11) उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच, शेतकरी कामगार पक्ष सुरक्षा रक्षकांच्या कायम पाठीशी ठाम उभा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याशिवाय अधिवेशनातून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील निश्चितपणे करतील, अशी ग्वाही दिली.
![](http://krushival.in/grygrars/2023/12/skp1-e1702295259927-1024x555.jpeg)
जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्याची आशा होती. हजारो तरुणांनी पात्रतेनुसार अर्ज केले होते. 3 हजार 200 जागांपैकी 700 जागा भरण्यात आल्या. मात्र, अद्यापर्यंत 2500 भरती केलेले उमेदवारांना प्रत्यक्षात नोकरी मिळाली नाही. जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे वारंवार अर्ज विनंत्या करण्यात आल्या आहेत. परंतु कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या तरुणांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. श्रमिक व असंघटित कामगार हक्क संघटनेच्या वतीने हा लढा सुरु केला आहे.
![](http://krushival.in/grygrars/2023/12/SKP2-e1702295312863-1024x573.jpeg)
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दुपारी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांची समस्या जाणून घेतली. शेतकरी कामगार पक्ष तुमच्या पाठीशी कायम आहे, असे आश्वासन देत उपोषणाला पाठींबा दिला.