| सांगोला | प्रतिनिधी |
राज्यातील माढा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची इंडिया आघाडीकडे शेकापने मागणी केली आहे. येथील लोकांच्या मनात काय आहे हे मला माहीत आहे. शेकापचा कार्यकर्ता जिद्दी असून, निष्ठा ठेवणारा आहे. जय-पराजय होत असतो, परंतु आम्ही सन्मान सोडत नाही. शेकापचा मतदारसंघात जो सन्मान आहे, तो पुढच्या पिढीने चालविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
सांगोला येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर शेतकरी कामगार पक्षातर्फे सोमवार (ता. 11) रोजी शेतकरी मेळावा झाला. यावेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे आमदार रोहित पवार, रतनबाई देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड, बाबुराव गायकवाड अभिषेक कांबळे, शिवसेनेचे सूर्यकांत घाडगे, तुषार इंगळे, सुरज बनसोडे, दत्तात्रय टापरे, वैभव केदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील मेळाव्यास मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, रोहित पवार यांनी प्रथम पंचवीस वर्षे व्यवसाय केला व त्यानंतर ते आमदार झाले, जनतेला कळले पाहिजे. शेकापमुळे रामदास आठवले हे खासदार झाले; परंतु भाजपामध्ये जाऊन त्यांनी विचाराला तिलांजली दिली, अशी खंत व्यक्त केली.
शेकापमध्ये मतभेद असले तरी पक्षात लोकशाही आहे. तुमच्या मनात काय आहे हे मला माहीत आहे, तुमच्या मनाचा आदर मी नक्कीच करणार आहे. परंतु, आताच मी उमेदवारीची घोषणा करणार नाही, तर इंडिया आघाडीची जागावाटपानंतर तुमच्या मनातील व्यक्तीचा मी निश्चितपणे आदर करेन. यावेळी दत्ता टापरे, सूरज बनसोडे, डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
प्रस्ताविक विनायक कुलकर्णी यांनी केले. या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार जयंत पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख यांची खुल्या वाहनांमधून काढण्यात आलेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.
सांगोल्याचा पुढचा आमदार शेकापचाच काय हितलं वातावरण, काय ती लोकं, काय येथील लोकांचे प्रेम, काय तो स्वाभिमान, सगळं जबरदस्त! परंतु, येथील झाडीवाल्या आमदारांना हे कधीच दिसले नाही. दुसऱ्या राज्यातील हॉटेल चांगली वाटत आहेत. ते पुढचे आमदार होणार नाही, तर शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख हेच सांगोल्याचे पुढील आमदार असतील, असा विश्वास शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. काही महाशक्ती घराघरांत वाद निर्माण करुन ते कुटुंब, पक्ष, पार्टी फोडत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे यांना लक्ष देण्यास वेळ नसून, दुसऱ्याचे कुटुंब फोडण्यासाठीच यांना अधिक वेळ आहे. परंतु, मराठी माणूस कधीच दिल्लीसमोर झुकणार नाही. माझ्यावर कितीही कारवाया करा, मला अटक केली तरी मी माझा स्वाभिमान व निष्ठा सोडणार नाही, असा निर्धार रोहित पवार यांनी केला.
स्व. आबासाहेबांचे (गणपतराव देशमुख) यांचे कार्य आज सांगण्याची गरज नाही. त्यांनी केलेल्या कामावर, विचारावरच शेकाप पक्ष पुढे जात आहे. कोणाचे पार्सल कुठे पटवायचे हे जनताच ठरवेल. आज कोणी, किती, काय काम केले हे मी सांगणार नाही. मी पक्षाच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता असून, जनताच तुमचा निश्चितपणे हिशोब करेल, असे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी बोलून दाखवले.
डॉ. बाबासाहेब देशमुख
जनताच तुमचा हिशोब करेल