गडचिरोलीत शेकापचे ‘हर घर जोडो’ अभियान

समाजातील सर्व घटकांना पक्षाशी जोडण्यासाठी सभासद नोंदणी करणार

| गडचिरोली | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरातील प्रत्येक वॉर्डात पक्ष शाखांची स्थापना करण्यात येणार असून, 13 ते 27 फेब्रुवारीदरम्यान ‘हर घर जोडो’ अभियान राबविणार आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थी, युवक, महिला व पुरुषांना पक्षाशी जोडण्यासाठी पक्ष सभासद नोंदणी करण्यात येणार आहे.

याबाबत शेतकरी कामगार पक्षाने प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, 130 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने 80 कोटी लोकांना 5 किलो मोफत रेशन दिल्याचा आणि 25 कोटी जनतेला गरिबीतून मुक्त केल्याचा दावा अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी 2024 दरम्यान केला आहे. हा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा खोटारडेपणा देशातील सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, युवक, बेरोजगार, छोटे दुकानदार, नोकरदारांची, गळचेपी करणारा आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव, आरोग्य, शिक्षणावरील कमी केलेली तरतूद, गरिबांना आणखी गरिबीच्या खाईत लोटणार आहे. सर्व क्षेत्रातील पराकोटीचे खासगीकरण येणार्‍या पिढ्यांच्या उरावर बसणार असून, गरिबांच्या मुलांना शिक्षण, आरोग्य, नोकरी, रोजगार मिळणे बंद होणार आहे.

देशापातळीवरील या परिस्थितीमुळे आपल्या गडचिरोली शहरातही त्याची झळ बसणार असून, दुकानांमध्ये काम करणारे नोकरदार, कामगार, मजूर, छोटे दुकानदार, व्यापारी, गृहिणी, युवक, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नसल्याची टीका शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

शहरातील फुटपाथ दुकाने, घरकुल, अतिक्रमणे कायम करून प्रॉपर्टी कार्ड मिळणे, रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची सोय यासारख्या समस्यांचे निवारण होणे आवश्यक आहे. अशा स्थितीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून सत्तेच्या राजकारणापेक्षा भांडवलदार, कारखानदारांविरोधात सरकारशी सामान्य माणसांसाठी विधिमंडळात आणि रस्त्यावरचा संघर्ष करणार्‍या शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली एकत्र येऊन आवाज बुलंद करण्याची आता वेळ आलेली आहे. त्यासाठी गडचिरोली शहरातील गरीब सामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, छोटे दुकानदार, नोकरदार, महिला, विद्यार्थी, बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने आपापल्या वॉर्ड शाखेचे मोठ्या संख्येने सभासद होऊन एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्री जराते, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, जिल्हा समितीचे सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, रेश्मा रामटेके, विजया मेश्राम, छाया भोयर, रजनी खैरे, शुल्का बोबाटे, संगिता बोदलकर, अस्मिता लाटकर, धारा बन्सोड, कुसूम नैताम, पुष्पा कोतवालीवाले, योगेश चापले, भीमदेव मानकर, राजकुमार प्रधान, बाबुलाल रामटेके, विनोद उराडे, अंकुश मारभते, भूषण चिंचोलकर यांनी केले आहे.

Exit mobile version