। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या शब्दानुसार आक्षी गावातील मंजूर असलेल्या अंतर्गत रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून, शुक्रवारपासून आक्षी-साखर मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दिवाळीच्या पूर्वीपासूनच या कामासाठी साहित्य दाखल झाले होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते साईनगर आक्षी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी सरपंच नंदकुमार वाळंज, विनायक पाटील, रश्मी पाटील, श्याम गण, उल्हेश नाखवा, संजय कोळी, तुळशीराम चौलकर, पांडुरंग पेरेकर, रश्मिन गुरव, विलास राणे आदी उपस्थित होते.
शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी आक्षी ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार, आक्षी स्तंभ ते साखर कोळीवाडा साई मंदिर आक्षी बीचपर्यंतचा अडीच किलोमीटर रस्ता मंजूर करण्यात आला आहे. पावसाळ्याआधी 700 ते 800 मीटरच्या रस्त्याचे खडीकरण यापूर्वीच झालेले आहे. तसेच पावसामुळे थांबलेल्या उर्वरित रस्त्याचे काम चालू करण्यात आले आहे. त्यासाठी दिवाळीपूर्वीच लागणारे मटेरियलदेखील पडले होते. मुख्य रस्त्याचे काम जेसीबीने माती काढून रस्त्याची लेवलिंगचे काम 9 नोव्हेंबरपासूनच सुरु करण्यात आले होते. हे काम शेकापच्या माध्यमातून पूर्णत्वास जात असल्याने नौटंकी करीत विरोधकांनी 10 नोव्हेंबरला रस्त्यासाठी आंदोलन अशी हाक देऊन 10-12 टाळकी जमा करुन आंदोलनाचा फुसका बार सोडला. मात्र, शेकापच्या शब्दावर विश्वास असलेल्या आक्षी ग्रामस्थांनी अजिबात प्रतिसाद न दिल्याने या आंदोलनाचा फज्जा उडाल्याने हसे झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना संजय पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, आतापर्यंत आक्षीमध्ये शेकापच्या माध्यमातूनच विकासकामे करण्यात आली आहेत. असे असताना रस्त्याचे काम होत असल्याचे दिसत असताना स्टंटबाजी करणार्या विरोधकांना नक्की कशाची पोटदुखी आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त केले. एकही विकासकाम न करणार्या विरोधकांनी नौटंकी बंद करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
सदर रस्त्याचे 700 ते 800 मीटर खडीकरण पावसाळ्यापूर्वी झाले असून, कोरोनामुळे असलेल्या निर्बंधामुळे वेळेवर साधन सामुग्री तसेच कामगार उपलब्ध नव्हते. त्यातच डांबर प्लांट बंद म्हणून या कामाला उशीर झाला. मटेरियल पडल्यानंतर दिवाळीनंतर रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात होईल हे लक्षात येताच सेनेच्या या बिनकामी माजी सरपंचाने स्टंटबाजी सरु केली होती. मात्र, दिलेल्या शब्दानुसार शेकापने काम सुरु केल्याने ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहेत.