महायुती पेचात, गुंतागुंत वाढली; शिंदे सेना मुंबईहून रिकाम्या हाती
| नाशिक | प्रतिनिधी |
नाशिक लोकसभेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दहा दिवसांचा अवधी बाकी असतानाही नाशिकचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच वाढला आहे. शिंदे सेनेचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. 21) नाशिकमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण केले असले तरी, या शिलेदारांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. भाजपने ‘ठाणे द्या अन् नाशिक घ्या’ हा आपला ‘जप’ कायम ठेवल्याने ठाणेदारांकडून नाशिकवर पाणी सोडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून, आता शांतिगिरी महाराजांसह अनेकांची नावे घेतली जात असल्याने नाशिक मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
नाशिक लोकसभेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 26 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवसांची मुदत शिल्लक असतानाही, महायुतीचा नाशिकचा उमेदवार ठरत नसल्याचे चित्र आहे. महायुतीतून छगन भुजबळ यांनी उमेदवारीबाबत माघार घेऊन दोन दिवस लोटले तरी शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार निश्चित होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असलेले ‘उबाठा’चे संघटक विजय करंजकर यांना ‘वर्षा’वर ‘वेटिंग’वर ठेवत, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, खासदार हेमंत गोडसे यांना मुंबईत पाचारण केले. मुख्यमंत्री शिंदे यांची गोडसे आणि बोरस्ते यांच्याशी चर्चा झाली असली तरी शिंदेंकडून प्रचार कायम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपकडून नाशिकबाबत ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला नसल्यामुळे शिंदेंकडून उमेदवारीचा निर्णय ‘साइड’ला टाकल्याचे समजते. भाजपने ‘ठाणे द्या अन् नाशिक तुम्ही घ्या’, अशी मारलेली पाचर आजही कायम ठेवल्याने शिंदे गटाला नाशिकबाबत निर्णय घेता येत नसल्याचे चित्र आहे. शिंदेंकडून ठाण्याचा त्याग करण्याची शक्यता कमीच असल्याने नाशिकवर पाणी सोडले जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही आता ‘आस्ते कदम’ची भूमिका स्वीकारल्याचे चित्र आहे.
संघटनात्मक ताकदीच्या जोरावर भाजपने नाशिकवर दावा ठोकला असताना, भुजबळांचे नाव पुढे आले होते. परंतु, आता भुजबळांनी माघार घेतल्याने भाजपने नाशिकच्या जागेबाबतची सक्रीयता वाढवली आहे. शिंदे सेनेकडून जागा भाजपकडे आल्यास, पर्याय म्हणून भाजपनेही उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. त्यात शांतिगिरी महाराजांचेही नाव पुढे आले आहे. तसेच, ॲड. राहुल ढिकले यांच्यासह केदा आहेर यांच्याही नावाची चर्चा आहे. 25 एप्रिलपर्यंत नाशिकचा उमेदवार निश्चित होईल, असा दावा केला जात असल्याने भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.