। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात नेहमीप्रमाणे वणवे लागू लागले असून हे वणवे मानवनिर्मित कि नैसर्गिक आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. परंतु सगुणा वन संवर्धन टीमकडे योग्य नियोजन नेरळ भागात वणव्यांवर सुरु असताना कर्जत भागात वणवे रोखण्यासाठी वन विभाग सक्रिय नसल्याचे दिसून येत असून रविवारी कर्जत जवळील शिरसे टेकडी वानवा लागल्याने जाळून खाक झाली. दरम्यान, तीन तास हा वावा भडकत असताना वन विभागाला स्थानिकांनी फोनद्वारे माहिती देऊन देखील वन कमर्चारी तेथे पोहचले नाहीत.
कर्जत तालुक्यातील कर्जत-वासरे परिसरातील दोन टेकड्या या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडल्या असून आकुर्ले येथील टेकडी नंतर शिरसे येथील टेकडी रविवारी वणव्याने काळी झाली आहे. रविवारी लागलेला हा वणवा सायंकाळी सात वाजता लागला होता आणि त्यानंतर तब्बल तीन तास तेथील डोंगर जळत होता. त्या काळात येथील स्थानिक तरुणांनी वन विभागाला फोनद्वारे लागलेल्या वणव्याबद्दल माहिती दिली, परंतु संपूर्ण टेकडी आगीच्या भक्ष्यस्थानी आली तरी वन कर्मचारी तेथे पोहचले नव्हते. त्यात ती टेकडी वनविभागाच्या मालकीची असून गेल्या काही वर्षात तेथे सातत्याने वृक्षारोपण वन विभाग करीत असते आणि अशा ठिकाणी जाळरेषा काढून वणवे रोखण्याचे काम वन विभागाने केले नाही आणि त्यामुळे गवताबरोबर तेथील झाडे देखील आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत.