। पनवेल । प्रतिनिधी ।
गेल्या 4 महिन्यांपासून संपूर्ण कामोठे शहरात अनियमित आणि कमी पाणीपुरवठा होत असून सलग दोन दोन दिवस पाणी येत नसून नागरिक खूप त्रस्त आहेत. अजूनही सोसायटीमध्ये नियमित पाणी येत नाही आणि खूप कमी प्रमाणात पाणी येत आहे. दिवसातून फक्त 1 ते 2 तास पाणी येत आहे. याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील कामोठे येथील शिवसैनिकांनी सिडको भवन येथे जाऊन सिडको अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला.
यावेळी बोलताना उपशहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी सांगितले की, गेल्या 4 महिन्यांपासून संपूर्ण कामोठे शहरात अनियमित आणि कमी पाणीपुरवठा होत आहे. अजून पण सोसायटीमध्ये नियमित पाणी येत नाही आणि खूप कमी प्रमाणात पाणी येत आहे आणि दिवसातून फक्त 1 ते 2 तास पाणी येत आहे. त्या संदर्भात अनेक तक्रारी येत असून रोज टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आमच्यावर आली आहे. कामोठेमध्ये पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी सिडकोची कामोठेमध्ये एकच पाण्याची टाकी आहे. त्यामुळे कधी पाण्याच्या टाकीचे काहीही काम निघाले कि, पाणी एक ते दोन दिवस पाणी येत नाही. तसेच, कामोठे येथील लोकसंख्या पहिली खूप कमी होती. मात्र, आता तीच लोकसंख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे पाण्याचा वापरही वाढला असून पाणीटंचाईचा नागरिकांना त्रास होतो. तरी कामोठेमध्ये सुरु असलेल्या नवीन पाण्याच्या टाकीचे काम जलद गतीने करून नागरिकांना लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरु करावा. तसेच, पाणी सोडायची वेळ सकाळी आणि संध्याकाळी निश्चित ठेवावी. अन्यथा रायगड भवन येथे 31 जुलै रोजी बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.






