शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर !

| मुंबई | प्रतिनिधी |

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत गुरुवारी (दि.14) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या समोर सुनावणी पार पडली. त्यामध्ये शिंदे गटाकडून निहार ठाकरे यांनी बाजू मांडली तर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. जो निर्णय द्यायचा आहे तो द्या, आम्ही पुन्हा तुमच्याकडे येणार नाही असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला. तर शिंदे गटाकडून कागदपत्रांसाठी दोन आठवड्यांच्या वेळेची मागणी करण्यात आली. दोन्हीकडची बाजू ऐकून घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना कागदपत्रांच्या देवाणघेवाणीसाठी एका आठवड्याचा वेळ दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा विषय आखणी लांबणीवर गेला आहे. शिवसेना पक्षात गेल्या वर्षी मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला आणि भाजपाबरोबर हातमिळवणी केली. परिणामी राज्यातले उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपाने मिळून राज्यात सरकार स्थापन केलं आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंच्या गटाला निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली.

त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवलं जावं अशी मागणी केली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने आपण विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही असं म्हणत आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी आज (14 सप्टेंबर) पहिली सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आज पहिली सुनावणी पार पडली. दरम्यान, पहिल्या दिवसाची सुनावणी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले, मी कुठल्याही आरोप प्रत्यारोपांवर भाष्य करणार नाही. मी सध्या न्यायिक अधिकारांतर्गत काम करतोय. त्यामुळे माझ्यासमोर जी सुनावणी होत आहे त्यासंदर्भात बाहेर कुठलंही भाष्य करणं मला उचित वाटत नाही. या कायदेशीर प्रक्रियेविषयी बाहेर बोलणं उचित नाही. ज्यांना बाहेर आरोप करायचे आहेत, त्यांनी खुशाल करावेत. त्यांनी आरोप केले तरी मी नियमांनुसार आणि घटनेत ज्या तरतुदी आहेत त्याच्या अनुषंगानेच काम करणार. या सुनावणीसाठी म्हणजेच ही कारवाई पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ आम्ही दिला आहे. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर वादी आणि प्रतिवाद्यांना पुढच्या सुनावणीची तारीख कळवली जाईल. या सुनावणीनंतर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी आमदार किशोर पाटील म्हणाले, विधान भवनात आज महत्त्वाची सुनावणी झाली. दोन्ही वादी आणि प्रतिवाद्यांनी आपापली बाजू मांडली. दोघांच्याही वकिलांनी आपलं म्हणणं लेखी स्वरुपात सादर केलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी पुढील सुनावणीसाठी येत्या आठ दिवसांत (22 किंवा 23 सप्टेंबर) आणि 10 दिवसांनंतर (25 सप्टेंबर) अशा दोन तारखा दिल्या आहेत. आज सुनावणीवेळी एकूण 41 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या एकत्र करून आगामी दोन तारखांना त्यावर सुनावणी होईल.

शिंदे गटाचं म्हणणं काय?
ठाकरे गटाने सादर केलेली कागदपत्रे अद्याप आम्हाला मिळालेली नाहीत. त्यामुळे आमची बाजू मांडण्यात अडचणी येत आहेत. गणेशोत्सव असल्याने आम्हाला दोन आठवड्यांचा वेळ द्यावा, त्यानंतर आम्ही अभ्यास करुन उत्तर पाठवू. यावर दोन्ही गटांना याचिकार्त्यांची याचिकांची प्रत देण्यात येईल, असे सांगताना 10 दिवसांत शिंदे गटाच्या आमदारांनी याचिकेवर लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश नार्वेकर यांनी दिले.

Exit mobile version