। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार? हा प्रश्न अनुत्तरीत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी मागणार्या अर्जावर निर्णय देण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाने वकील जोएल कार्लोस यांच्या वतीने ही याचिका केली आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्या.कमल खाता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही याचिका सादर करण्यात आली.
तसेच मुंबई महानगरपालिका परवानगी देण्याची शक्यता नाही. त्यामुळे या अर्जावर मुंबई महानगरपालिकेला तातडीने निर्णय देण्याचे आदेश द्या, अशी शिवसेनेची मागणी आहे. न्यायालयानेही याचिकेवर तातडीने सुनावणी गरजेची असल्याचे सांगून या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी ठेवली आहे. मुंबई मनपा आयुक्त आणि जी-उत्तर विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.