उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
| मुंबई | प्रतिनिधी |
सध्याचे मुख्यमंत्री स्वत:चं घर सोडून इतरांची घरे धुंडाळतात. आता देखील ते राज्यात नसून तेलंगणात गेले आहेत. स्वत:चे घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरात डोकावणारे हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
राज्यात नियोजन शून्य विकासकामे सुरू आहेत. हे असंवैधानिक मुख्यमंत्री कृत्रिम पाऊस पाडणार होते. पण ते देखील त्यांना करता आले नाही. मुंबईत प्रदुषण वाढत आहेत, अशी चिंता ठाकरे यांनी व्यक्त केली.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. द्राक्ष आणि कांद्याचे नुकसान झाले. आधीच केंद्राच्या नाकर्ते धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला होता. राज्य वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री राज्याच्या बाहेर फिरत असल्याबाबत त्यांनी टीका केली.
काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. मात्र मंत्रिमंडळाने काय केलं. पिक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात गेली नाही, तर मी दिवाळी साजरी करणार नाही, असे आपले कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले होते. मात्र ते दिवाळीत काही दिसले नाहीत. त्यांनी कुठं फटाके फोडले त्यांना माहिती, असा टोला त्यांनी लगावला.
राज्यात काही शेतकऱ्यांना 20 रुपयाचे चेक मिळाले. यावर बोललं तर गद्दार गळा काढतात. ते म्हणतात, मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे, आम्हाला अभिमान आहे. मात्र या गरिब शेतकऱ्याची पंचतारांकित शेती आहे. ते शेतात हेलिकॉप्टरने जातात. मी तर म्हणतो अशी शेती आणि वैभव सर्व शेतकऱ्यांना मिळो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला. पंतप्रधान क्रिकेटचा अंतिम सामना पहायला जातात पण मणिपूरला जात नाहीत. आमचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना सगळ्यांना दमदाटी करायला वेळ आहे, इतर राज्यात प्रचार करायला वेळ आहे. मात्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीवर हात फिरवण्याला त्यांना वेळ नाही, असेही ते म्हणाले.
राज्यातील अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसान झालेल्यांना सरकार मदत करणार आहे, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले.