तीन भाविकांचा जागीच मृत्यू
। वर्धा । वृत्तसंस्था ।
महाशिवरात्रीनिमित्त वर्धा येथील चार मित्र आष्टीमधील पचमडी येथून देवदर्शनाला मध्य प्रदेशात निघालेल्या भाविकांच्या कारचा सोमवारी (दि. २८) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये वर्ध्यातील दोन तर अमरावतीमधील एक असे अक्षय, तुषार आणि दीपक या भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एकजण बचावला असून त्याचे नाव अद्यापपर्यंत कळू शकले नाही.
मध्यप्रदेश मधील पचमडी येथे जाताना मोरका गावाजवळ रस्त्याच्या वळणावर चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटल्याने वळणावरील भिंतीला गाडीने जबर धडक दिली. या धडकेत कार चारवेळा पलटल्यानंतर थांबली. अपघात इतका भीषण होता की कारमधील तीन जण जागीच ठार झाले. या घटनेने आष्टी व तीवस्यात शोककळा पसरली आहे.