। दिघी । वार्ताहर ।
राज्य भारनियमनातून लवकरच मुक्त होईल अशी घोषणा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळत आहे. मात्र, तशी माहिती महावितरणकडून स्पष्ट होत नसल्याने श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांच्या डोक्यावर भारनियमनाची टांगती तलवार कायम आहे.
श्रीवर्धनमध्ये लोडशेडिंगच्या झटक्याने संतापाचा भडका उडाला आहे. तालुक्यामध्ये महावितरणकडून कुठलीही पूर्वसूचना न देता 60 ते 80 गाव वाड्यावरील एकाचवेळी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. वीज वितरण विभागाकडून भारनियमनातुन मुक्तीचा दिलासा मिळत असला तरी दिवसभर उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या येथील रहिवाशांची रात्री – अपरात्री लोडशेडिंगमुळे संतापाचा पारा चढला आहे. मात्र, महावितरण कंपनीकडे याची कोणतीही माहिती नसल्याने किंवा भरनियमन मुक्ततेची स्पष्टता होत नसल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.
उडवाउडवीची उत्तरे
संपूर्ण श्रीवर्धन तालुका भरनियमनाच्या संकटात होरपळत आहे. तालुक्यातील प्रत्येक विभागातील दुय्यम अभियंता कार्यालयातील अधिकार्यांना विचारले असता आम्हाला याची माहिती नसल्याचे सांगण्यात येत असल्याने महावितरणाच्या विरोधात संताप व्यकत करण्यात येत आहे.
येथे भारनियमन आजही सुरूच
दिघी, कुडगाव, नानवली, आदगाव, वेळास, वडवली, शिस्ते, दिवेआगर, बोर्लीपंचतन, भरडखोल, वांजळे, शेखाडी, वाळवटी, श्रीवर्धन, जसवली याठिकाणी 2 ते 3 तास तर जांभूळ परिसरात 4 तास भारनियमन सुरू असून संपूर्ण तालुक्यात लोडशेडिंग आहे.
तालुक्यातील भरनियमन बंद होण्याबाबत कोणतीच सूचना नाही, वरूनच वीज खंडित होत आहे. त्यामुळे अद्याप तसं काही झाले नाही. – रविकिरण पाटील, महावितरण अधिकारी श्रीवर्धन.
वरिष्ठांकडून भरनियमन बंद संबंधित कोणतेच परिपत्रक कार्यालयाला मिळाले नाही. तसे काही होईल ते प्रत्येक तालुक्याला माहिती देण्यात येईल. – गणेश पातपोहे, कार्यकारी अभियंता गोरेगाव विभाग.







