| दिघी | वार्ताहर |
सलग चार दिवस सुट्यांचा पाऊस असताना, वादळी पावसाने पर्यटनाला चांगलाच फटका दिला. मात्र, चार महिन्यानंतर पहिल्यांदाच पर्यटनाची मोठी संधी मिळाल्याने भरपावसात श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन हाऊसफुल्ल झाले. दुसरीकडे पर्यटनावर अवलंबून असणारी मच्छिमारी ठप्प झाली. शुक्रवारपासून सुरू झालेल्या सुटीने दिवेआगर पर्यटन स्थळी चारशेहून अधिक गाड्यांचा ताफा पोहचला. सध्या दिवेआगरमध्ये घरगुती व हॉटेल अशी एकण 356 ठिकाणी राहण्याची सोय आहे. यावेळी सर्वच फुल्ल होऊन हजारो पर्यटकांनी दिवेआगरला भेट दिली.
दुसरीकडे अरबी समुद्रात वादळी पावसासह वाऱ्यांची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. शनिवार रात्रीपासून वादळी पाऊस पडत आहे. या वादळापासून संरक्षण करण्यासाठी समुद्रात असलेल्या बोटींनी दिघी पोर्ट येथील बंदराजवळ आसरा घेतला. आठशेहून अधिक बोटींचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे बोटी किनाऱ्याला लागल्याने पर्यटन हंगामात येथील मासेमारी ठप्प झाली आहे.