माती उत्खनन पोलादपूर तालुक्याच्या मुळावर

धोक्याची ठिकाणे वाढली
केवनाळे,साखर सुतारवाडीचा यापूर्वीच समावेश
पोलादपूर | शैलेश पालकर |
माती उत्खनन करण्याच्या घटनांमुळे पोलादपूर तालुक्यातील संभाव्य दरडग्रस्त क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली असून पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे आणि देवळे या दोन धरणांनादेखील या माती उत्खननामुळे धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील केवनाळे आणि साखर सुतारवाडी या गावांवर यंदा दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पुढे आलेल्या धक्कादायक वास्तवामध्ये केवनाळे गांव2005 पासून संभाव्य दरडग्रस्त गावाच्या यादीत समाविष्ठ असून दरवर्षी पावसाळ्यामध्ये केवनाळे गावाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या नोटीस देण्यात येत असत.पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली.

पोलादपूर तालुक्यात प्रशासनाने आपत्ती निवारण कायद्याच्या अनुषंगाने दरवर्षी संभाव्य दरडग्रस्त गावांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या नोटीसा बजावण्याचे कर्तव्य पार पाडले आहे. मात्र, सुरक्षित ठिकाणी जाऊन पुन्हा जेवण्यासाठी आपल्याच असुरक्षित ठिकाणी असलेल्या घरात येऊन जेवण्याची अपरिहार्यता या नोटीसांमध्ये कुठे राहायचे आणि जेवायचे कुठे याबाबत स्पष्ट निर्देश नसल्याने निर्माण झाली. पोलादपूर तालुक्यातील 15 महसुली गावांवर दरड कोसळण्याची शक्यता असून प्रशासन या नैसर्गिक आपत्तीसाठी सज्ज आणि सतर्क असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मात्र, 2005 पासून ही यादी कायम असून अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना इतरत्र होऊनही यादीमध्ये सदर दरडग्रस्त गावांची नोंद करण्यात यादीमध्ये करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

पंधरा गावे दरडग्रस्त
लोहारे, कोतवाल खुर्द, सवाद, चरई, केवनाळे, पार्ले, कोंढवी, सडवली, तुटवली, ओंबळी, महाळुंगे, परसुले, भोगावे येलंगेवाडी, माटवण, हावरे ही पंधरा महसुली गावे पावसाळयामध्ये धरणग्रस्त होण्याची शक्यता असल्याचे सन 2005 भूस्खलनानंतर दरवर्षी प्रशासनाकडून जाहीर केले जात आहे. महामार्गावरील डोंगर कापण्याने तसेच महाबळेश्‍वर मार्गावरील डोंगर कापण्यामुळे तसेच केवनाळे येथेही आंबेमाचीपर्यंतचा रस्ता करताना भरावासाठी डोंगराची माती वापरल्याने दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

साखर सुतारवाडीची घटना अनपेक्षित
साखर सुतारवाडी येथील यंदा दरड कोसळण्याची घटना प्रशासनाला अनपेक्षित होती. तालुक्यात केवनाळे आणि साखर सुतारवाडीतील दूर्घटनांनंतर आलेल्या मदतीचा ओघ संपूर्ण तालुक्याला आगामी काही महिने पुरण्याइतपत असून संभाव्य दरडग्रस्त गांवांना यापुढे शासनाने आपत्तीनिवारण कायद्यानुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून जेवणाचीही सोय केल्यास केवनाळे येथे असुरक्षित ठिकाणी असलेल्या घरात जेवतानाच पाच जणांचे बळी गेल्याची घटना पुन्हा घडणार नाही.

याखेरीज, पोलादपूर शहरातील पार्टेकोंड येथील रस्ता आणि दाभिळ, हळदुळे, चांदके खोपड, कामथे माडाचीवाडी, नावाळे, सडवली- गोपाळवाडी, कुडपण, कापडे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील काही लोकवस्तीच्या भागांमध्ये रस्ते करताना झालेल्या उत्खननामुळे मोठया प्रमाणात दगडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. आंबेनळी आणि कशेडी घाटरस्ता रूंदीकरणावेळी डोंगर बाजूचे उत्खनन तसेच ब्लास्टिंग केल्यामुळे दरड कोसळण्याचा धोका कायम निर्माण झाला आहे. 2005 साली झालेल्या अतिवृष्टी नंतर भूस्खलनामुळे कोतवाल खुर्दमधील नऊ व्यक्तीचा बळी गेला होता तर कोंढवी गावातील अनेक घरांना आणि जमिनीला भेगा पडल्या होत्या. लोहारे पवारवाडी येथे जमीन दुभंगून दोघांचा बळी गेला होता. यानंतर नैसर्गिक आपत्ती निवारण कायद्यानुसार दरवर्षी दरडग्रस्त गावांची यादी जाहीर करून प्रशासनाकडून धोका असणारी लोकसंख्या स्थलांतराचे ठिकाण संपर्क अधिकारी अथवा कर्मचारी यांची नित्यनेमाने यादी जाहीर केली जात आहे. मात्र, वाढीव दरडप्रवण क्षेत्राचा या यादीमध्ये उल्लेख दिसून येत नाही, आश्‍चर्याची बाब मानली जात आहे.

Exit mobile version