| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना 12 वा हप्ता प्राप्त करून घेण्यासाठी ईकेवायसी करणे बंधनकारक आहे. यासाठी शासनाने 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. मुरुड तालुक्यातील अद्यापही 3,438 इतक्या लाभार्थ्यांचे ईकेवायसी करणे शिल्लक आहेत. यापूर्वी वेगवेगळ्या माध्यमातून लाभार्थ्यांना ई केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे ईकेवायसी करण्याच्या उद्देशाने तहसीलदार रोहन शिंदे यांनी विशेष शिबिराचे आयोजन केलेले आहे. हे 29 व 30 ऑगस्टदरम्यान होणार आहे. हे शिबीर सेतू कार्यालय मुरुड, महा ई सेवा केंद्र उसरोली टेप, बोर्ली नाका, वळके व मुरुड तसेच सर्व ग्रामपंचायत कार्यालयमध्ये आयोजित करण्यात आले आहे. तरी, लाभार्थींनी सकाळी 10 ते 6 या वेळेत ईकेवायसी करून घ्यावे, असे आवाहन मुरूड तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.