बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

| आगरदांडा | प्रतिनिधी |

जय श्रीराम बुद्धिबळ प्रेमी संघटना, जय श्रीराम नागरी पतसंस्था तसेच मुरुड व रायगड जिल्हा बुद्धिबळ असो. यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव येथील माळी समाज सभागृहात बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील 103 स्पर्धकांनह बुद्धिबळाच्या पटावर आपले बुद्धि चातुर्य दाखवत स्पर्धेचे आव्हान कायम ठेवले.

स्पर्धेदरम्यान दिलीप पाटील यांनी, मुरुड तालुक्यात प्रथमच आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आयोजकांचा आत्मविश्वास दुणावला असल्याचे मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी जयश्रीराम नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप जोशी, संचालक सुनिल विरकुड, गणेश ठोसर, सिद्धेश गद्रे, डॉ. संजय पाटील, सुशिल गुरव, नांदगाव सरपंच अल्पा ताई घुमकर, विद्याधर चोरघे, प्रभाकर गाणार, मंगेश कमाने, रमेश पाटील, मयुरेश गद्रे, जनार्दन पुगावकर, मुख्य पंच अर्थव दातार व संजय ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेतील खुल्या गटात समनिल गुरव प्रथम क्रमांक, वेदांत मेहता द्वितीय क्रमांक व आयन दावणे याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर, 16 वर्षाखालील गटात अर्थव वाघ प्रथम क्रमांक, गौतम पवार द्वितीय क्रमांक व आयुष पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच, मुलींच्या खुल्या गटात अरुणा मयेकर तर 16 वर्षाखालील गटात नूपूर जमनू या पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत.

Exit mobile version