परिवहनमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालण्याची मागणी
| श्रीवर्धन | वार्ताहर |
दहा ते बारा वर्षांपूर्वी श्रीवर्धन परिवहन आगार विभागामध्ये तसेच राज्यामध्ये एक नंबरचे उत्पन्न देणारे आगार होते. श्रीवर्धन परिवहन आगाराच्या लांब पल्ल्याच्या अनेक फेर्या त्यावेळी चांगले उत्पन्न आणून देत होत्या. त्यावेळेला नवीन गाड्यादेखील श्रीवर्धन आगारामध्ये नियमितपणे दिल्या जात असत. तसेच त्यावेळी असलेले आगारप्रमुख हेदेखील अनुभवी व कामामध्ये रुची असणारे होते. त्याचप्रमाणे त्यांच्या हाताखाली असणारा कामगार वर्गदेखील गाड्यांचे काम योग्य प्रमाणात करत होता. त्यामुळे श्रीवर्धन परिवहन आगाराचा कारभार योग्य दिशेने सुरू होता. परंतु, श्रीवर्धन आगार तोट्यामध्ये जाण्याचे मुख्य कारण माणगाव आगाराची निर्मिती झाल्यानंतर श्रीवर्धन आगाराचे उत्पन्नाचे स्त्रोत खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाले.
एकेकाळी श्रीवर्धन आगारातून कोल्हापूर त्याचप्रमाणे बीड, लातूर अशा लांब पल्ल्याच्या मार्गावरती फेर्या सुरू होत्या. परंतु, आजमितीला आगारात बसेसची उपलब्धता नसल्यामुळे या फेर्या बंद पडल्या असून, केवळ श्रीवर्धन-सातारा व श्रीवर्धन-मिरज या बस फेर्या सुरू आहेत. तर, श्रीवर्धन-पुणे या दिवसातून दोन बस फेर्या सुरू आहेत. श्रीवर्धन आगारात सध्या शिवशाही व स्लीपर कोच असलेल्या गाड्या त्याचप्रमाणे नवीन आलेल्या विठाई गाड्या सोडल्या, तर जुन्या असलेल्या गाड्या लांब पल्ल्याला पाठवण्याच्या परिस्थितीत नसल्याचे दिसून येते.
सध्या मुंबई, बोरिवली, ठाणे, भाईंदर, नालासोपारा, कल्याण, भिवंडी या फेर्यासुद्धा वेळापत्रकानुसार सुटत नाहीत. अनेक वेळा स्थानिक फेर्यांवरतीसुद्धा गेलेल्या गाड्या ब्रेक फेल होणे, ब्रेक डाऊन होणे, टायर पंक्चर होणे या कारणाने नेहमीच बंद पडलेल्या पाहायला मिळतात. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीवर्धन आगारामध्ये नवीन बस गाडी देण्यातच आलेली नाही. तसेच गाड्यांना लागणारे सुटे भागदेखील पुरवण्यात महामंडळाकडून दिरंगाई केली जात आहे. श्रीवर्धन आगारात आगारप्रमुख असलेले तेजस गायकवाड यांची बदली रोहा आगारात झाल्याने त्यांच्या जागी श्रीवर्धन येथे एका वाहतूक निरीक्षकाच्या हातात श्रीवर्धन परिवहन आगाराचा आगारप्रमुख पदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. गाड्यांची नादुरुस्त असलेली अवस्था, त्याचप्रमाणे उपलब्ध असलेल्या गाड्यांवरती अनेक फेर्यांचा ताण, यामुळे गाड्या वेळेवर न सुटणे, त्याचप्रमाणे गाड्या सुटल्यानंतर रस्त्यामध्ये बंद पडणे, यामुळे श्रीवर्धन आगाराचे नाव बदनाम होत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी श्रीवर्धन-पुणे व श्रीवर्धन-मिरज या बसेसची मागची चाके निखळल्याचा प्रकारदेखील झाला होता. श्रीवर्धन आगारातील खराब बसेसचा ठपका ठेवून अनेक कर्मचार्यांना विनाकारण निलंबितदेखील करण्याचे प्रकार झालेले आहेत. तरी राज्याच्या परिवहनमंत्र्यांनी श्रीवर्धन आगाराबाबत तातडीने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन श्रीवर्धन आगारामध्ये अनुभवी आगारप्रमुख नेमावा, त्याचप्रमाणे श्रीवर्धन आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून होत आहे. अन्यथा प्रवाशांना आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे प्रवासीवर्गाकडून बोलले जात आहे.