। हाथरस । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी घटना घडली. यामध्ये 122 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 150 हून अधिक जखमी आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, हातरस येथील सिकंदरराव कोतवाली भागातील फुलराई गावात भोले बाबाचा प्रवचनाचा कार्यक्रम सुरू होता. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने एकच गोंधळ उडाला. एका अंदाजानुसार 1.25 लाख लोक या सत्संगसाठी आले होते. गर्दीमुळे लोकांचे हाल होऊ लागले. उन्हामुळे लोक बेशुद्ध झाले आणि नंतर चेंगराचेंगरी झाली. लोक जमिनीवर पडले तेव्हा इतर लोक त्यांना चिरडून बाहेर येऊ लागले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस चेंगराचेंगरीतील मृतांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. 24 तासांत चौकशी अहवाल मागवला आहे. हाथरसमधील परिस्थिती अजूनही नियंत्रणात नाही. सर्वत्र मृतदेह दिसत आहेत.