सांगलीचे सुवर्ण चढाईत यश
। सांगली । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असो.ने युवक मराठा मंडळाच्या सहकार्याने 51व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन सांगलीतील सांगलीवाडी येथील चिंचबाग मैदानावर करण्यात आले आहे. यास्पर्धेत कुमार गटातील पुणे ग्रामीण, रायगड व ठाणे शहर यांनी कुमार गटात उपांत्य फेरी गाठली आहे. यजमान सांगलीला मात्र उपांत्य फेरी गाठण्यासाठी ‘सुवर्ण चढाई’पर्यंत झुंजावे लागले.
या स्पर्धेतील कुमार गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात सांगलीने सुवर्ण चढाईच्या डावात नंदुरबारला 30-29 असे चकवित उपांत्य फेरी गाठली. सुरवातीपासून अतितटीने खेळला गेलेल्या या सामन्यात पूर्वार्धात 13-12 अशी आघाडी सांगलीकडे होती. परंतु, नंदुरबारने पूर्ण डावात त्यांना 23-23 असे बरोबरीत रोखले. ही कोंडी सोडविण्याकरीता 5-5 चढायांचा जादा डाव खेळविण्यात आला. त्यानंतर ही 29-29 अशा बरोबरीत हा डाव संपला. शेवटी सामन्याच्या नियमानुसार सुवर्ण चढाई देण्यात आली. त्याकरिता पुन्हा नाणेफेक करण्यात आली. नंदुरबारच्या बाजूने नाफेकीचा कौल लागला. परंतु, नंदुरबारचा खेळाडू चढाईत गुण घेऊ न शकल्याने पंचाने त्याला बाद दिले. आणि सांगलीने एकच जल्लोष केला. आदित्य येसगुडे, व्यंकटेश वडार यांच्या झंझावाती चढाया त्यांना ओम् शिंदे, प्रतीक जाधव यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे सांगलीला हा विजय मिळविता आला.
दुसर्या सामन्यात पुणे ग्रामीणने 5-5 चढाईत कोल्हापूरचे आव्हान 31-30 असे संपविले. पहिल्या डावात 13-10 अशी आघाडी घेणार्या पुणे ग्रामीणला कोल्हापूरने पूर्ण डावात 25-25 असे बरोबरीत रोखले. या बरोबरीमुळे दोन्ही संघाना 5-5 चढाया देण्यात आल्या. त्यात एका गुणांनी पुणेकरांनी बाजी मारली. प्रणव भांगर, साहिल माने यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. कोल्हापूरच्या समर्थ देशमुख, शुभम रेपे यांनी शेवटच्या 10 मिनिटात भन्नाट खेळ करीत. सामन्यात बरोबरी साधली. परंतु, विजय मात्र त्यांच्यापासून दूरच राहिला.
तिसर्या सामन्यात रायगडने परभणीवर 38-33 अशी मात केली. विश्रांतीला 19-12 अशी आघाडी घेणार्या रायगडला परभणीने नंतर कडवी लढत दिली. राज मोरे, नीरज मिसाळ यांच्या दमदार चढाया त्यांना समीर हिरवे, हर्ष सुकर यांची मिळालेली भक्कम बचावाची साथ यामुळेच रायगडने हे साध्य केले. परभणीच्या रमेश गायकवाड, बाबुराव जाधव, विजय तारे यांनी विश्रांतीनंतर आपला खेळ उंचावत कडवी लढत दिली. शेवटच्या सामन्यात ठाणे शहरने मुंबई उपनगर पश्चिमचा 37-33असा पाडाव केला. आक्रमक सुरुवात करीत ठाण्याने पहिल्या डावात 21-12 अशी मोठी आघाडी घेतली. दुसर्या डावात उपनगरने आपला खेळ गतिमान करीत ही आघाडी कमी करीत आणली. परंतु, संघाला विजयी करण्यात ते कमी पडले. आफताब मंसूरी, आदित्य पिनाने, सोहम जाधव यांच्या सर्वांगसुंदर खेळाने ठाण्याने हा विजय साकारला.