राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा
। सांगली । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असो.ने युवक मराठा मंडळाच्या सहकार्याने 51व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड कबड्डी स्पर्धेचे आयोजन सांगलीतील सांगलीवाडी येथील चिंचबाग मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे ग्रामीण आणि ठाणे शहर यांनी अनुक्रमे कुमारी व कुमार गटाचे विजेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेतील कुमारीच्या अंतिम सामन्यात गत उपविजेत्या पुणे ग्रामीण संघाने गत विजेत्या पिंपरी चिंचवडचा प्रतिकार 32-25 असा मोडून काढत स्वर्गीय चंदन सखाराम पांडे फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. या विजयाने पुणे ग्रामीणने गत वर्षातील पराभवाची परतफेड केली आहे. पूर्वार्धात पहिल्या चार मिनिटांत लोण देत 9-1 अशी आघाडी घेतली. पिंपरी चिंचवडने यातून सावरत लोणची परतफेड करीत ही आघाडी कमी केली. विश्रांतीला 18-13 अशी पुणे ग्रामीणकडे आघाडी होती. विश्रांतीनंतरदेखील सामन्यात चुरस पहावयास मिळाली. मात्र, पुणे ग्रामीणने आपल्या हातून आघाडी निसटून दिली नाही. शेवटी 7 गुणांनी पुणे ग्रामीणने सामना जिंकला. वैभवी जाधव, साक्षी रावडे यांच्या झंझावाती चढाया त्यांना प्रतिक्षा लांडगे, सृष्टी मोरे यांची मिळालेली पकडीची साथ यामुळेच हे शक्य झाले. पूजा तेलंग, रुपाली डोंगरे, भूमिका गोरे, वृषाली रोकडे यांचा खेळ पिंपरी चिंचवडला विजयी करण्यात थोडा कमी पडला.
कुमार गटात ठाणे शहरने पुणे ग्रामीणचा कडवा प्रतिकार 33-31 असा पराभव करीत स्वर्गीय प्रभाकर नागो पाटील फिरता चषक आपल्या नावे केला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावेधक ठरलेल्या या सामन्यात पूर्वार्धात 24-10 अशी आघाडी ठाणे संघाकडे होती. उत्तरार्धात पुण्याने विजयासाठी ठाण्याने चांगलेच झुंजविले. शेवटची पाच मिनिटे पुकरली तेव्हा 32-26 अशी ठाण्याकडे आघाडी होती. आफताब मंसुरी, आदित्य पिलाने, रोहन टोपरे यांच्या चढाई पकडीच्या खेळाने ठाणे शहरने हा चषक उंचाविला. प्रणव बांगर, साहिल माने, रोहन टोपारे यांनी उत्तरार्धात कडवी लढत देत आघाडी कमी केली. पण संघाला विजयी करण्यात ते अयशस्वी ठरले.
या अगोदर झालेल्या मुलींच्या उपांत्य सामन्यात पिंपरी चिंचवडने अहमद नगरला 32-17 असे तर पुणे ग्रामीणने ठाणे शहराला 36-26 असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली. मुलांच्या सामन्यात पुणे ग्रामीणने सांगलीला 32-17 असे, तर ठाणे शहरने रायगडला 34-28 असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती.