निवडणूक लढवण्यासाठी पैस नसल्याचे विधान
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून तब्बल सहा हजार कोटींहून अधिक देणग्या घेऊनही भाजपच्याच नेत्या आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निवडणूक लढण्यासाठी पैसे नसल्याचे म्हटले आहे. हे कारण देत त्यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपाने आतापर्यंत सात याद्या जाहीर केल्या असून काही मतदारसंघाच्या याद्या अद्याप बाकी आहेत. अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक लढविण्यासाठी पैसे नसल्याने आपण ही निवडणूक लढविणार नसल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.
नड्डा यांनी तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशातून लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यास माझी हरकत नाही, पण निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, असे त्यांनी नड्डा यांना सांगितले. तुम्ही तर देशाच्या अर्थमंत्री आहात आणि तुम्हीच म्हणत आहात की माझ्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत, असे विचारले असता देशाचा निधी हा माझा नाही. माझा पगार, सेव्हिंग माझी आहे, असे उत्तर सीतारामन यांनी दिले.
लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचे जे निकष आहेत, तेदेखील मान्य नसल्याचे नड्डा यांना सांगितल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. तुम्ही अमक्या जातीचे आहात किंवा तमक्या धर्माचे आहात, असे निकष निवडणूक जिंकण्यासाठी लावले जातात. त्याआधारे उमेदवारी दिली जाते. परंतु, हे निकषच मान्य नाहीत, सीतारामन म्हणाल्या.







