श्रीलंका मालिकेआधी रहाणे, पुजाराला रणजी स्पर्धेत कामगिरीची संधी – गांगुली

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
श्रीलंका मालिकेआधी होणार्‍या रणजी करंडक स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेऊन निवड समिती भारताचा संघ निवडेल. त्यामुळे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्‍वर पुजाराला कामगिरी दाखवण्याची सुवर्णसंधी असेल, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले आहे. रणजी करंडक स्पर्धेला 10 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. तर श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ही मार्चमध्ये आहे. त्यामुळे रणजी स्पर्धेत रहाणे आणि पुजाराने सातत्याने धावा काढल्यास त्यांना संघातील स्थान टिकवता येईल. अर्थात हा निर्णय निवड समितीच्या अखत्यारित येतो, असे गांगुलीने सांगितले.


रणजी सामन्यांच्या संख्येत कपात झाल्यामुळे खेळाडूंना आर्थिक फटका बसेल, याबाबत गांगुली म्हणाला, खेळाडू विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळल्याबद्दलही वाढीव मानधन मिळाले आहे. करोना साथीच्या काळात जैव-सुरक्षा परिघात रणजी स्पर्धेच्या आयोजनाबाबत आम्ही वैद्यकीय समितीशी चर्चा केली. त्यांच्या सल्ल्यानेच प्रत्येक गटात चार संघ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदाची आयपीएल क्रिकेट भारतात व्हावी, याबाबत आम्ही आशावादी आहोत. योजनाही आमच्याकडे तयार आहे. देशातील करोना साथीच्या स्थितीचा आम्ही आढावा घेऊन याबाबत निर्णय घेऊ. – सौरव गांगुली, बीसीसीआय अध्यक्ष

Exit mobile version