| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात भटक्या श्वानांची संख्या बेसुमारपणे वाढलेली आहे. त्याचा त्रास सर्वानाच होत असल्याने या श्वानांची संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विविध सरकारी, खाजगी कंपनींच्या सहकार्याने श्वानांचे निर्बिजीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी शेकाप नेते, माजी आ.पंडित पाटील यांनी केली आहे.
या संदर्भात कृषीवलशी बोलताना त्यांनी जिल्ह्यात वाढत चाललेल्या श्वानांच्या बेसुमार संख्येबाबत चिंता व्यक्त केली. श्वान दंश होण्याच्या घटना जिल्ह्यात दररोज घडताना दिसतात. यावर तातडीने आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने जे.एस.डब्ल्यू., रिलायन्स सारख्या विविध कंपन्यांकडून विशेष बाब म्हणून सीसीआर फंडातून निधी घेऊन श्वानांचे निर्बिजीकरण मोहीम सुरु केली पााहिजे,असे त्यांनी सुचित केले. राज्य सरकार अपघातग्रस्तांना आर्थिक मदत देते पण श्वान दंशाने मृत्यूमुखी पडलेल्यांना सरकारकडून अशी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणले. सध्या तर फिरायला जाणेही मुश्लिक झाले असून, श्वानांची टोळीच्या टोळी अंगावर येण्याच्या घटना ठिकठिकाणी घडल्या आहेत, असे ते म्हणाले.
रायगड जिल्हा परिषदेच्या पशु वैद्यकीय विभागाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या माध्यमातून जिथे जिथे पशु वैद्यकीय दवाखाने आहेत त्या ठिकाणी श्वानांचे निर्बिजीकरण मोहीम सुरु केली तर काही प्रमाणात भटक्या श्वानांची संख्या कमी होऊन त्याचा नागरिकांना होणारा धोका कमी होईल, असे पंडित पाटील यांनी सुचित केले.