। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
शिवसेनेशी बंडखोरी करणार्यांना पुन्हा येण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करु नये,ते सर्वजण स्वार्थासाठी बंडखोरी करुन तिकडे गेलेले आहेत,अशी टीका माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रत्नागिरी येथे केली.
रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेलया शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना गीते यांनी बंडखोर तसेच भाजपवर जोरदार टीका केली. ते जनतेच्या प्रश्नांसाठी नसून वैयक्तिक स्वार्थासाठी तिकडे गेल्याची टीका अनंत गीतेंनी केली. जे सुरू आहे ते दुर्दैवं आहे. फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी ज्यांनी कुणी बंड केले, त्यात जनतेचं हित काय आहे? ते कोकणच्या विकासासाठी गेले आहेत का? जनतेच्या प्रश्नासाठी गेले आहेत का? त्यात नुकसानच होणार आहे. पण या सगळ्या नुकसानाला जबाबदार हे बेईमान बंडखोर असणार आहेत, असं गीते म्हणाले.
अशाप्रकारे शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्याचं पाप करू नये असा इशारा आपण मोदींना दिल्याचं गीते म्हणाले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. इशारा हा शब्द मुद्दाम वापरतोय. फक्त राजकीय फायद्यासाठी, सत्तेसाठी शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी संघटनेच्या गळ्याला नख लावण्याचं पाप तुम्ही करू नका. हे सांगण्याचं धाडस माझ्याकडे आहे. तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही कोणतं पाप करत आहात. शिवसेना ही केवळ महाराष्ट्राची गरज नसून अखंड हिंदू राष्ट्राची गरज आहे, अशा शब्दांत गीतेंनी संताप व्यक्त केला.