। उरण । वार्ताहर ।
विशेष आर्थिक क्षेत्रासाठी संपादित झालेल्या जमिनी परत मिळण्याची शेतकर्यांची आशा पल्लवित झाली आहे. उरण, पेण आणि पनवेल या तालुक्यांमधील शेतकर्यांचा शासन दरबारी प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. सेझग्रस्त शेतकरी चळवळ संघटनेच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. शेतकर्यांच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शासन दरबारी शेतकर्यांच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे उरण, पेण, पनवेल तालुक्यातील मे. मुंबई इंटीग्रेटेड एसईझेड लि. या कंपनीला मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 63/1अ अनुसार विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) स्थापन करण्याकरीता दिलेल्या मे. विकास आयुक्त, (उद्योग) मुंबई यांच्या परवानगी आदेशाचे कलम 1 प्रमाणे शेतकर्यांना जमीन मिळकती मूळ किंमतीस परत करण्याबाबत सरकारने आदेश दिले होते. परंतु अद्याप पर्यंत त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. याबाबत सेझग्रस्त शेतकरी चळवळ संघटनेने सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करूनही शेतकर्यांना न्याय मिळाला नाही. म्हणून शेतकर्यांच्या प्रमुख शिष्टमंडळाने महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी शेतकर्यांच्या जमिनी परत मिळवून देण्याबाबत आपण सरकार दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासित केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, कोकण विभाग युवक अध्यक्ष प्रमोद बागल, गणेश नलावडे, उरण तालुका विधानसभा अध्यक्ष अॅड. दत्तात्रेय नवाले , उरण तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर रघुनाथ घरत, पेण तालुका अध्यक्ष हेमंत म्हात्रे, सचिव आनंद रमेश ठाकूर, उपाध्यक्ष प्रभाकर अनंत मोकल, सचिव रामदास लखु दवई , खजिनदार प्रदीप गजानन मोकल, सुमित ज्ञानेश्वर घरत, रोहित जगदीश ठाकुर, शांताराम चांगू म्हात्रे, रघुनाथ जोमा घरत, गणेश पाटील आदी उपस्थित होते.