। मुंबई । प्रतिनिधी ।
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी गावागावापर्यंत पक्षाची यंत्रणा लागते, कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करावे लागते. पाच-सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये संपर्क असावा लागतो. आता तर पक्षाच्या यंत्रणेच्या पलीकडे मित्रपक्षांचे सहकार्यसुद्धा आवश्यक असते. अशा परिस्थितीमध्ये दोन शिलेदारांनी महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे, त्यापैकी एक आहेत राजू शेट्टी आणि दुसरे रविकांत तुपकर. दोघेही शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे आणि महायुती किंवा महाविकास आघाडीपासून ते वेगळे राहून स्वतंत्रपणे लढत आहेत.
बुलढाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे अपक्ष लढत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांच्यातील कार्यकर्त्यांची जडणघडण झाली आणि प्रभावी वक्तृत्व आणि मुद्देसूद आक्रमक मांडणीमुळे ते राज्यभर लोकप्रियही झाले. शेतकरी संघटनेच्या परंपरेप्रमाणे शेट्टी आणि तुपकर यांच्यात मतभेद होऊन तुपकर राजू शेट्टी यांच्यापासून वेगळे झाले. बुलढाणा मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते नरेंद्र खेडेकर समोरासमोर आहेत.
दोघांनाही महायुती आणि महाविकास आघाडीतील तीन तीन पक्ष तसेच त्यांच्या राज्य, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या प्रचारसभांची मदत झाली. याउलट तुपकर कोणत्याही पक्ष आणि नेत्यांच्या मदतीशिवाय एकटे लढले आणि मतदारसंघात उत्तम वातावरण निर्मिती केली.
केवळ शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी केलेले लढे एवढ्याच भांडवलावर सामान्य शेतकरी कुटुंबातील हा तरूण मैदानात उतरला आहे. 2021 मध्ये त्यांनी सोयाबीन-कापूस दरवाढीसाठी केलेले अन्नत्याग आंदोलन राज्यभर गाजले. त्यांच्या नावावर अनेक आंदोलने आहेत. मतदार त्यांना कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे दोन वेळा खासदार झाले आहेत. शेट्टी यांना 2019 च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षासोबत राहून त्यांनी निवडणूक लढवली. परंतु भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करून एनडीएमधून बाहेर पडणारे ते पहिले खासदार होते. भाजपसोबत गेल्याबद्दल त्यांनी आत्मक्लेश आंदोलनही केले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत ते महाविकास आघाडीसोबत होते. परंतु शेतकरी प्रश्नांसंदर्भात आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आघाडीची साथ सोडली.