देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची घोषणाबाजी; पोलिसांकडून लाठीचार्ज

। नांदेड । वृत्तसंस्था ।

मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याचा आढावा घेणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथे कार्यक्रमानंतर बाहेर येताक्षणी काही तरुणांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती केव्हा सुरु होणार? असा सवाल यावेळी जमा झालेल्या तरुणांनी उपस्थिती केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिनाभरापूर्वी पोलीस भरतीची घोषणा केली होती. राज्यात साडेसात हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबवणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसंच गृह विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

तरुणांवर सौम्य लाठीचार्ज
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातल्याने पोलिसांनी याठिकाणी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर सौम्य लाठीचार्ज केला. विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीसांना घेराव घातलेला. दरम्यान देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांना भेटले. पण काहीही न बोलताच ते तिथून निघून गेले.

Exit mobile version